Thursday, December 3, 2020

नामदेवच्या ‘काळोखातल्या कविता’

 पत्रकारीतेने मला साहित्यापासून थोडं दूर नेऊन ठेवलंय, असं आता वाटू लागलंय. ते दिवस आज मला प्रकर्षाने आठवताहेत जेव्हा एखादी साहित्याकृती हाती पडली की, केव्हा एकदा ती वाचून पूर्ण करतो असे व्हायचे आणि लगोलग त्याचे रसग्रहण करण्यासाठी कागद आणि पेन समोर ओढले जायचे. छापण्यासाठीच असे नाही; बऱ्याचदा पुन:प्रत्ययासाठी ते केले जायचे. पण आज किती वर्षे झालीत एखाद्या कथा, कविता संग्रहावर लिहून तेही आठवेनासं झालंय. इतरांच्या जगण्याचेच विषय थेट समोर येऊन उभे राहातात आणि मग त्यांच्यासाठीच संगणकाच्या की पॅडवर बोटं नाचायला लागतात. अर्थात, तेही एक वेगळं ‘साहित्य’च आहे आमच्यासाठी, नाही का? 





हे सारं आठवण्याचं कारण एका संवेदनशील तरुणाचा कविता संग्रह आहे. नामदेव कोळी त्याचं नाव आणि ‘काळोखातल्या कविता’ हा कविता संग्रह. याच कविता संग्रहाच्या शेवटी प्रस्तावनेच्या स्वरुपात त्यावर दीर्घ लेख छापलेला आहे. पण खरं सांगायचं तर तो माझ्याकडून दीड पानाच्या वर वाचला गेला नाही. कवितेचा अर्थ इतर कोणी समजावून सांगू नये, असं मला वाटतं. तो ज्याचा त्याने समजून घ्यावा. कविता वाचताना जे एक चित्र, दृष्य डोळ्यासमोर उभं राहातं ना, त्यातले रंग, चेहरे आणि भावनाही आपल्या स्वत:च्या असाव्यात. तसं असेल तर मिळणारी अनुभूती खरा आनंद देते. दुसऱ्यांच्या डोळ्यांनी ते पहाताना उगाच अंधत्वाची जाणीव व्हायला लागते आणि ते नकोसं होतं. भलेही त्यांच्या चित्रातले रंग अधिक गहिरे, अधिक गडद असतील, चेहरे स्पष्ट आणि आकर्षक असतील आणि भावना अधिक खोलवरच्या असतील तरी. मला त्या चित्रांपेक्षा आपल्या डोळ्यातलीच चित्र अधिक भावतात. असो.


नामदेवचा हा कविता संग्रह वाचल्यानंतर जे काही व्यक्त व्हावंस वाटतंय ते आकलन नाही आणि विवेचनही नाही. ती अनुभूती आहे. पुनरूक्तीचा आनंद घेण्याचा एक प्रयत्न आहे. स्वानंदासाठीची धडपड आहे असंही म्हणता येईल. खूप वर्षांनी ती करावीशी वाटतेय. का वाटतेय ? नीट सांगता येणार नाही. कदाचित नामदेवच्या कवितांमध्ये त्यासाठीची ऊर्जा दडलेली असेल. कदाचित त्याच्या अनुभूतीशी माझ्या अनुभूतीचं नातं अधिक घट्ट जुळलं असेल. जे लहानपणी, अगदी तारूण्यातल्या अर्ध्या आयुष्यापर्यंत जगलो ते अनुभव या कवितांनी पुन्हा नव्याने दिले असतील. काहीही कारण असू शकेल. पण या कवितांनी माझ्या हृदयाला स्पर्श केला आहे असं वाटतंय. म्हणूनच पुन्हा पुन्हा मी त्या वाचतोय. 


अर्ध्या आयुष्यापर्यंत जे अनुभव घेतले त्या अनुभवांचे रंग मला नामदेवच्या कवितांमध्ये दिसले. त्या रंगातला एक ठळक रंग म्हणजे काळोख. अंधार. कधी तो किर्रर्र असेल तर कधी त्यात एखादी उजेडाची तिरीप असेल. कधी डोळे मिटल्यामुळे आलेले अंधारलेपण असेल तर कधी दिवसा उजेडी परिस्थितीच्या धक्क्याने डोळ्यांपुढे आलेली अंधारी असेल. काळोखाची ही रुपंही जेव्हा कविता बनतातना, तेव्हा सरसरून काटा येतो अंगावर. 


कविता तेव्हाही होती

आजही आहे

रात्रीला घट्ट बिलगलेल्या 

काळोखासारखी 


इथे काळोखाची कविता बनली आहे की कवितेवर स्वार झालाय काळोख ? पुन्हा तेच. कविता वाचताना आणि वेचताना जे वाटेल तेच खरं. कविता जन्म घेईपर्यंत कवीची असते. नंतर ती वाचणाऱ्याची होते. त्यामुळे कवितेचा अर्थ कवीने नाही सांगू. तो वाचणाऱ्याला दिसू द्यावा. नामदेवच्या या कवितांमध्ये अशा दिसणाऱ्या आणि दाखवणाऱ्या जागा जागोजागी सापडल्या मला. त्या जागांवर थोडं थांबून डाेळे आणि मन तेवढं उघडायचं, बस्स. कधी थरथरून काटा येतो अंगावर तर कधी आवंठा. कधी आपणच पाहू लागतो आपल्याकडे मागे वळून. मग आत्मपरीक्षणाचीही एक लहर येऊन जाते, समुद्राच्या काठावर एखादी मोठी लाट येऊन पुन्हा समुद्राशी एकरूप होऊन जावी तशी. 


बापानं थेट म्हातारपणीही

माझ्यासाठी गावातली 

गुरं-ढोरं राखली


मी ऐन तारुण्यातही

भटकतोय बेलगाम 

घोड्यासारखा.


२००६ साली नामदेवने ही कविता लिहीली. त्यावेळी तो अगदीच तारुण्यात असेल. शिक्षण आणि नोकरीच्या मागे लागलेला. भटकत राहिलेला आणि काहीसा भरकटलेला. त्या भरकटलेपणाची बाेचणी अशी कधी तरी कविता बनून आली असेल कागदावर. ज्यांच्या आयुष्यात असा काळ येऊन गेलाय त्यांच्यासाठी या ओळी काय देऊन जातात हे त्यांनाच कळावं. नामदेवने दिलंय तेवढंच शब्दरूप खूप आहे त्यासाठी.


काळोखाच्या या कवितांमध्ये काळोखापेक्षाही अधिक दिसते आणि पानोपानी भेटते ती नामदेवची माय. खरं तर ती काही जगावेगळी आई नाही. इतरांची असते तशीच दिसते या कवितांमध्ये. तीच गरीबी, तोच मायेचा समुद्र, तीच तगमग, तीच असहायता. तरीही नामदेव तिच्या भावनांना चितारतो तेव्हा ते चित्र अधिक भावतं. एका कवितेत तो म्हणतो, 


दिवसभर राबून

मध्यरात्री तुटक्या खाटेवर

माय घेते विश्रांती कण्हत कण्हत

तिचं मन मात्र निघून जातं हळुवार

सरणापर्यंत

सुखाचं मरण शोधत.


आपण कधीच कसा विचार नाही केला आईच्या मनाचा, असा प्रश्न टोचला मनाला ही कविता संपली तेव्हा. म्हणूनच कविताही भिडली मनाला. हाच अनुभव दिला त्याच्या ‘मायनं कविता लिहीली असती तर’ या कवितेने. तो म्हणतो,


नियतीवर लिहायची असेल कदाचित तिला कविता.


मायचा राग संसाराची कुतरओढ ज्या नवऱ्यामुळे होते तिच्यावर नसतो. अकारण छळणाऱ्या सासू, नणंदांवर नसतो. तिला हा नियतीचाच खेळ वाटत असतो. म्हणून जाच देऊनही सासरची मंडळी आणि बऱ्याचदा पुढची पिढीही तिच्या रोशाचे बळी कधी ठरत नाहीत. पण त्याची साधी जाणीवही आपल्याला कधीच कशी होत नाही? असा प्रश्न तुमच्या संवेदनशील असलेल्या मनाला बोचल्याशिवाय राहात नाही. 


नामदेवच्या या संग्रहात त्याच्या वडिलांवरही कविता आहेत. तेही इतरांचे वडील असतात तसेच आहेत. पण त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यात शिरू शकतो तो नामदेव. एक कविता वयाने मोठ्या असलेल्या पण अकाली मृत्यू आलेल्या बहिणीवरही आहे. गावातल्या अकाली प्रौढत्व आलेल्या गावच्या ‘परकरी पोरीं’चे चित्रही त्याने कवितेतून चितारले आहे. सुखाचा उजेड क्वचितच कुठे असेल. पण म्हणूनच मनाच्या खोल गाभाऱ्यात या कविता पोहचू शकत असाव्यात. 


कविता संग्रह वाचताना जे काही वाटलं ते असं होतं. त्या निमित्ताने रसग्रहणाचा आनंद खूप वर्षानी घेता आला. पुन्हा इतका मोठा गॅप पडू नये असा प्रयत्न करायला हवा असं स्वत:लाच बजावतोय. पण त्यासाठी आधी असा एखादा नामदेवही भेटायला हवा ना. पाहू या भेटतोय का ते.  


Tuesday, April 7, 2020

लोकांनी टाळ्या वाजवल्या, दिवे पेटवले… यात मोदींचे श्रेय किती?

 



रात्री घरातील दिवे बंद करून जनतेला पणत्या आणि मेणबत्त्या पेटवायला सांगणाऱ्या भारताच्या पंतप्रधानांनी आधी स्वत: कोरोना महामारीच्या नियंत्रणाचे दिवे लावायला हवेत, असे मोदींचे टीकाकार म्हणतात. भारतातल्या २० टक्के जनतेलाही या म्हणण्यात तथ्य वाटलेले नाही, हे ५ एप्रिलला रात्री नऊ वाजता समोर आले. कारण ८० टक्क्यांपेक्षा जास्त घरात जे मोदींनी सांगितले ते घडले. २२ मार्चलाही असेच घडले होते. कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या देश बांधवांना टाळ्या आणि थाळ्या वाजवून सलामी द्या, हे मोदींचे आवाहन ८०/८५ टक्के जनतेने अत्यंत उत्साहाने पाळले होते. तरीही “मोदींनी हे ‘तमाशे’ आता तरी बंद करावेत आणि साथ नियंंत्रणासाठी ते काय करताहेत हे देशाला सांगावे,” असे मोदी विरोधक म्हणताहेत. ते मोदींचे विरोधक आहेत म्हणून तसे म्हणताहेत का? मुळात, असे म्हणणारे सगळेच मोदींचे विरोधक आहेत का? त्यांचे म्हणणे योग्य असेल तर मग भारतातली ८०/९० टक्के जनता मोदींना प्रतिसाद द्यायला वेडी आहे का? पाहूया या प्रश्नांची उत्तरे काय सांगताहेत ते. 


१७ मार्चच्या रात्रीचे संबाेधन, २९ मार्चच्या सकाळची मन की बात आणि २ एप्रिलच्या सकाळचा व्हीडीओ संदेश यात कुठेच पंतप्रधान मोदी यांनी भारत कोरोनाशी कसा लढा देतो आहे, हे देशवासियांना सांगितले नाही. पुढे काय होऊ शकते हेही सांगितले नाही. या देशात पुरेसे मास्क, पुरेसे सेनिटायझर, पुरेसे हाॅस्पिटल्स, पुरेसे व्हेंटिलेटर्स आहेत की नाहीत, नसतील तर आपण ते कसे निर्माण करतो आहोत या विषयी त्यांनी चकार शब्दही काढला नाही. पंतप्रधानांसारख्या पदावरच्या माणसाने देशवासियांना संबोधित करताना अशी माहिती देऊन नागरिकांना आश्वस्त करायला हवे, अशी अपेक्षा टीका करणारे व्यक्त करतात. ती अपेक्षा चुकीची आहे, असे म्हणता येत नाही. कारण आतापर्यंत देशाच्या नेत्याचे देशासाठीचे संबोधन तसेच राहिलेले आहे. खरी मेख आहे ती इथेच. 
आपण जे काही करतो आहोत ते देशाच्या आणि देशबांधवांच्या हिताचेच करतो आहोत यावर या देशातल्या बहुसंख्य जनतेचा विश्वास आहे, यावर नरेंद्र मोदी यांचा ठाम विश्वास आहे. देशातल्या नागरिकांनी प्रचंड बहुमताने दुसऱ्यांदा निवडून देऊन आपल्या कार्यपद्धतीवर आणि क्षमतांवर पूर्ण विश्वास दाखवला आहे आणि कोरोना विरुद्धच्या लढाईतही तो विश्वास कायम राहील, अशी त्यांची खात्री आहे. म्हणून आपण काय करीत आहोत हे जनतेला सांगत बसायची त्यांना गरज वाटत नसावी. हा फाजिल आत्मविश्वास आहे का? तर असू शकतो. पण तो तसा आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक निकालांशिवाय आपल्याकडे आज तरी दुसरी काही फूटपट्टी नाही. 

पूर्वीच्या नेत्यांनी अमूक एक असे केले म्हणून सर्वांनी तसेच केले पाहिजे, असे मानणाऱ्यांपैकी नरेंद्र मोदी नाहीत. आपल्या धक्का तंत्राने त्यांनी नेहमीच ते सिद्ध करून दिले आहे. कोरोनाच्या बाबतीतही ते त्यांच्या पूर्वाधिकाऱ्यांची वाट चोखळणार नाहीत हे उघड आहे. चूक झाली तर ती थेट जनतेशी संवाद साधून मान्य करायची, त्यासाठी जनतेची माफीही मागायची. अशावेळी जनता माफ करते ही त्यांची धारणा आहे. तसे नोटबंदीनंतर घडले आहे आणि आताही गरिबांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी जनतेची जाहीर माफी मागितली आहेच. हा थेट संवाद आहे. जनतेला तो आवडतो हे मोदींना चांगले माहिती आहे. त्यामुळे बहुसंख्य जनता आणि ते स्वत: यांच्यामध्ये ते अन्य कोणाला थारा देत नाहीत. ना पत्रकार, ना विरोधी पक्ष, ना राजकीय सल्लागार. असा थारा मिळत नाही म्हणून बहुतांश जण चिडतात आणि टीका करतात, अशी जनतेचीही धारणा झाली आहे. पण त्याच जनतेचा कथित कैवार घेणाऱ्यांना मात्र ती बाब लक्षात येत नाही. गडबड होते ती तिथे. 

टाळ्या, थाळ्या वाजविण्याच्या आणि विद्युत दिवे बंद करून पणत्या, मेणबत्त्या पेटवण्याच्या त्यांच्या आवाहनाकडे पाहू. असे केल्याने कोरोना नियंत्रणात येणार आहे का? मुळीच नाही. म्हणजे टीका करणारे खरे तेच बोलताहेत. फक्त जे त्यांना कळते आहे ते मोदींनाही कळत असते आणि या देशातल्या सर्वसामान्य जनतेलाही कळत असते हे त्यांना कळत नाही. किंवा कळूनही वळत नाही. म्हणून बहुसंख्य जनता त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. ही बाब मोदींना कळते म्हणून मग तेही या मंडळींकडे दुर्लक्ष करतात, हे वास्तव आहे. यात ज्या काही १५/२० टक्के लोकांना सत्य जाणून घ्यायचे असते त्यांना महत्वच राहात नाही. पण वर नमूद केलेल्या परिस्थितीचे परिणाम असेच असतात. अशा परिस्थितीत दोष द्यायचा तर तो बहुमताला महत्व असलेल्या लोकशाही व्यवस्थेला आणि समूहाच्या मानसिकतेला द्यायला हवा. मोदींना समूहाची मानसिकता कळते आणि त्यांच्या टीकाकारांना ती तितकीशी कळत नाही, हे वास्तव नाकारून कसे चालेल? 

टाळ्या, थाळ्या वाजवणे आणि पणत्या पेटवणे यात समूहाचे मानसशास्त्र काय आहे, हे नीट समजून घ्यायला हवे. २२ मार्चपासून संपूर्ण देश लाॅकडाऊनमुळे ठप्प झाला आहे. जे अत्यावश्यक सेवेत आहेत, ते आपल्या कामात व्यग्र आहेत; पण बहुसंख्य नागरिक, अत्यावश्यक सेवेत नाहीत म्हणून इतक्या दिवसांपासून कामाशिवाय घरी बसून आहेत. रिकामे डोके भुताचे घर बनते, अशी एक इंग्रजी म्हण आहे. त्यामुळे त्यांना काही तरी काम किंवा कार्यक्रम देत राहाण्याची गरज आहे. या मंडळींना वृत्तपत्रे, दूरदर्शन आणि इंटरनेट त्यांच्या गल्लीपासून व्हाईट हाऊसपर्यंतच्या सर्व बातम्या प्रत्येक मिनिटाला अपडेट करून देत आहेत. भरभरून अनुशंगिक माहितीही देत आहेत. पण ही माध्यमे या मंडळींना कार्यक्रम किंवा काम देऊ शकत नाहीत आणि त्यांच्यात सहभागीही करून घेत नाहीत ही त्यांची मर्यादा आहे. वाचन करणे हेही काम आहेच, असे कोणी म्हणेल. पण भारतात किती टक्के लोकांना वाचनाची, तेही अशा माध्यमांवर वाचनाची सवय आहे याची आकडेवारी तपासली तर त्याच्या मर्यादा लक्षात येतील. ज्यांना खरोखर काही जाणून घ्यायचे असते तेच अशा माध्यमांचा प्रयत्नपूर्वक वापर करतात हे लक्षात घ्यायला हवे. 

चांगला वक्ता/ संवादक (कम्युनिकेटर) काय करतो? तर ज्यांच्याशी तो संवाद साधू इच्छीतो त्यांना मधून मधून प्रश्न विचारतो, टाळ्या वाजवायला सांगतो, घोषणा द्यायला सांगतो किंवा मधून मधून त्यांना हसविण्याचा प्रयत्न करतो. तरच श्रोते किंवा प्रेक्षक त्या वक्त्याशी मनाने जुळून राहातात. हेच तत्व पंतप्रधानांनी १५ दिवसांत दोन वेळा दिलेल्या कार्यक्रमाच्या बाबतीत आहे. ‘साथ रोग निर्मूलनाच्या राष्ट्रीय कामात माझाही काही तरी सहभाग आहे’ असा वैयक्तिक विचार सामूहिकरित्या त्यामुळे केला गेला. अशी वैयक्तिक विचार/कृती सामूहिकपणे करण्याची संज्ञा समूहाच्या मानस‘शास्त्रात’ सांगितली आहे की नाही माहिती नाही. पण ती अत्यंत महत्वाची बाब आहे. टाळ्या आणि थाळ्या वाजवण्यात किंवा दिवे लावण्यात कसला आलाय राष्ट्रीय सहभाग? असा प्रश्न वाजवी नक्कीच आहे; पण वैयक्तिक विवेकासाठी, समूहाच्या मानसिकतेसाठी नाही. वैयक्तिक विवेकाला समूहात स्थान असत नाही. तो पूर्णपणे भावनांवर चालणारा खेळ आहे. विशेषत: छुप्या, दाबून ठेवलेल्या भावनांना साद घातली की समूहाला पटकन उद्दीपित करता येते. व्यक्तिला वैयक्तिकरित्या जे करायचे असते पण समाजाच्या लाजेखातर किंवा कायद्याच्या भीतीने, स्वत:च्या दृश्य प्रतिमेला जपण्याच्या गरजेतून किंवा अगदीच पर्याय नसतो म्हणून ती ते करू शकत नाही, अशा बाबी ती समूहाचा भाग होऊन पटकन करते. टाळ्या, थाळ्या वाजवण्यात आणि दिवे लावण्यात हे तत्व कुठे लागू पडते, ते पाहू.

२२ मार्चला ज्यांनी टाळ्या, थाळ्या, घंटा, शंख वाजवले ते आणि ५ एप्रिलला ज्यांनी दिवे लावले, फटाके फोडण्याचा वेडेपणा केला त्यांच्यातले ९५ टक्क्याहून अधिक लोक जे अत्यावश्यक सेवांमध्ये व्यग्र नाहीत आणि ‘वर्क फ्राॅम होम’ही करीत नाहीत असेच होते. मोदींना प्रतिसाद देणाऱ्या अशा समूहांना ज्यांनी जवळून पाहिले आहे त्यांनी त्या समूहांतील एकेक व्यक्ती डोळ्यासमोर आणून या नजरेने पहावी. या मंडळींना अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडणारी मोजकी मंडळी दिसत होती. गरिबांना धान्य, किराणा वाटप करणाऱ्या मंडळींचे फाेटो वृत्तपत्रातून प्रसिद्ध व्हायला लागले होते. आपल्यालाही ( समाजासाठी ) असे काही तरी करता यायला पाहिजे होते, असे वाटणारी ही मंडळी होती. असे काही तरी करताना त्यांना आपले फोटो सोशल मिडीयावर डीपी म्हणून, स्टेटस म्हणून ठेवायचे होते. त्यांची ती भावना आणि गरज मोदींनी ओळखली हे मोदींचे श्रेय आहे.  त्यांना अत्यंत सोपा आणि सहज करता येईल आणि आपण हे करीत आहोत हे इतरांना दाखवता येईल असा कार्यक्रम त्यांनी दिला म्हणून त्या आवाहनांना प्रतिसाद मिळाला हे लक्षात घ्यायला हवे. याच मंडळींना समजा घरात बसून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना कागदावर पत्र लिहा असा कार्यक्रम मोदींनीच दिला असता, अशा ओळखीच्या कोणत्याही व्यक्तीला एक फोन करून कृतज्ञता व्यक्त करा असे सांगितले असते तर असाच प्रतिसाद मिळाला असता का? अजिबात मिळाला नसता याची मला शंभर टक्के खात्री आहे. कारण भावना वैयक्तिक असली तरी कृती मात्र सामूहिक असावी लागते. तसे उपरोक्त कार्यक्रमात होत नाही. समाज कोरोनामूक्त व्हावा यासाठी आणि कोरोनाशी लढणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी प्रार्थना करा असे सांगितले असते तर कदाचित काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला असता. कारण त्यात कुटुंब म्हणून सामूहिक कृती करता येण्याची थोडी तरी शक्यता आहे. थोडक्यात काय, तर ८०/९० टक्के जनता वेडी आहे म्हणून हे कार्यक्रम यशस्वी झालेले नाहीत तर ती समाजातील मोठ्या वर्गाची गरज होती म्हणून यशस्वी झाले आहेत हे लक्षात घ्यायला हवे. यात मोठ्या समूहाची मानसिकता ओळखता येण्याचे श्रेय तेवढे मोदींचे आहे. 

विरोधी पक्षातील नेते या पद्धतीने विचार करताना कधी दिसत नाहीत. उलट या जनभावनेला, समाजाच्या मानसिकतेला वेडेपणा, तमाशा ठरविण्याची चूक ते अजूनही करीत आहेत. मोदींनी जो कार्यक्रम दिला तोच राहूल गांधींनी दिला असता तर यशस्वी झाला असता का? तर माझ्यामते झाला असता. कदाचित थोडा कमी; पण यशस्वी झाला असता. कारण ती घरात कामाशिवाय बसून असलेल्या, आपण समाजासाठी काहीच करीत नाही आहोत, अशा न्यूनगंडात जात असलेल्या समाजाची मानसिक गरज होती. पण समाजाची मानसिकता काँग्रेसच्या नेत्यांना ओळखता आली असती (जी काँग्रेसच्याच महात्मा गांधींनी सर्वार्थाने ओळखली होती ) तर आज या पक्षाची इतकी वाताहत झालीच नसती. मोदींनी आश्वासन देऊनही जनतेच्या खात्यात १५ लाख रुपये टाकलेच नाहीत, काळा पैसा विदेशातून आणलाच नाही, नोटाबंदीच्या काळात लोकांना प्राणाला मुकावे लागले, प्रचंड नोकऱ्या गेल्या, गुंतवणूक ठप्प झाली आणि तरीही लोकं मोदींनाच का निवडून देतात हे काँग्रेसच काय, बहुतांश विरोधी पक्षांच्या नेत्यांना कळत नाही त्यामागचे कारणही तेच आहे. त्यांना समूहाची मानसिकता ओळखता येत नाही. इंदिरा गांधी यांना ही कला बऱ्यापैकी अवगत होती. म्हणूनच इंदिरा गांधी इंदिरा गांधी होत्या. त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व लाभूनही प्रियंका गांधी यांना इंदिरा गांधी होता येत नाही. कारण प्रियंकाना इंदिरा गांधींचे रूप मिळाले पण समाजाची मानसिकता ओळखण्याची कला सोबत मिळाली नाही. एकाच वेळी आंदोलन करीत असूनही अण्णा हजारेंना जेवढी लोकप्रियता २०१२-१३ मध्ये मिळाली होती त्याच्या १० टक्केही रामदेव बाबांना मिळाली नव्हती त्यामागेही समूहाच्या मानसिकता ओळखण्याचाच मुद्दा होता. अरविंद केजरीवाल यांना ती निवडणुकीच्या अंगाने मोदींपेक्षा कदाचित अधिक कळाली म्हणून मोदीही त्यांना पराभूत करू शकले नाहीत हे आपण पाहतोच आहोत.  

एकूणच काय, तर अशा कृतींकडे राजकीय नजरेतून पाहाण्याऐवजी समाजाच्या नजरेतून पाहिले पाहिजे. राजकीय मंडळींना त्यांची राजकीय गरज म्हणून कदाचित तसे करता येत नसेल किंवा तसे करूनही व्यक्त करता येत नसेल हे समजू शकते. पण पत्रकारांनी तरी समाजाशी संबंधित घटनांकडे मानसिकतेच्या अंगाने पाहायला काय हरकत आहे? अर्थात, त्यासाठी राजकीय भूमिकांची वस्त्रे उतरवून ठेवण्याची कला आधी पत्रकारांना आली पाहिजे असे मला वाटते.