Sunday, April 14, 2019

तुझं माझं जमेना अन्

निवडणुकीच्या निमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यात फिरत असताना अपसिंगे  नावाच्या गावात जगदीश पलंगे नावाचा तरूण भेटला. ३०-३२ वर्षे वयाचा असावा. त्याला सोबत घेऊन शेतकऱ्यांना भेटण्यासाठी एका दूरवरच्या शेतात गेलो. शेतात द्राक्ष लावलेले होते. द्राक्षवेलींच्या मांडवाखाली तो घेऊन आला. त्या मळ्याचा मालकही तरूण होता. गप्पा सुरू झाल्या. विषय शेतीशी संबंधितच होते. द्राक्षवेलींसाठी कसे वर्षभर काम करावे लागते हे तो तरूण मालक मला समजावून सांगत होता. मजूरांना द्यावी लागणारी मजुरी, तरीही त्यांचे कामावर न येणे, वेळेवर कामे नाही झालीत की वर्षभराचे चक्र चुकणे आणि त्यातून होणारे शेतकऱ्याचे नुकसान इत्यादि. आमच्यापासून ८, १० फुटांवर पाच, सहा मजुरांची एक टोळी छाटणीचे काम करीत होती. त्यांच्याकडे पाहून तो शेतमालक हळूच्म्णच माझ्या कानाजवळ येऊन म्हणाला, "साहेब, या वेलींच्या खाली सावलीत काम करायला मिळतं म्हणून हे मजूर आले आहेत. नाही तर इतकी नाटकं करतात ना, वैताग येतो नुसता. खरं सांगू का, सरकारने दोन रुपयांत गहू, तांदुळ द्यायला सुरूवात केली आणि मजुरांना काम करायची गरजच नाही उरली. आधी कसे, दिवसभर काम करून अडीचशे रुपये घेऊन जायचे. त्यातून २०० रुपये खर्च केल्याशिवाय त्या दिवसाचे त्यांचे आणि कुटुंबाचे भागायचे नाही. आपसूकच दुसऱ्या दिवशी कामावर यावे लागायचे. आता अडीचशे रुपये देऊन महिनाभराचे धान्य घरात भरून घेतात. अलिकडे तर रेशनवर स्वस्तात डाळी द्यायलाही सुरुवात केली आहे. त्यामुळे पाहायलाच नको. कामाची गरजच नाही राहिली यांना. त्यामुळे अक्षरश: पाय धरावे लागतात यांचे. तरी मजूर नाही मिळत. कसे बसे मिळाले तरी येणार साडेदहा वाजेपर्यंत. मग साडेबाराला जेवणाची सुटी, मग चहाची सुटी, त्यात लघवीला जाणार, तंबाखू खाणार. साडेपाच वाजत नाही तोपर्यंत यांची सुटी होते. शेती परवडत नाही ती यामुळेच."

शेतीचं बिघडलेलं अर्थकारण नेमकं कशामुळे बिघडलं आहे हे ऐकून घेऊन आम्ही तिथून निघालो. सोबत जगदीश पलंगे होताच. चालता चालता मी म्हटलं, एकीकडे आम्ही म्हणतो बेकारी वाढली, लोकांच्या हाताला काम नाही आणि इथे तर काम करायला माणसं नाहीत अशी स्थिती आहे. त्यावर जगदीश हसला. म्हणाला, शेतकऱ्यांचे म्हणणे अगदीच चुकीचे आहे असे नाही. पण टाळी एका हाताने वाजत नाही साहेब. मजुरांना कामाची गरज असली की शेतकरीही मजुराकडून जास्तितजास्त काम काढून घेण्याचा प्रयत्न करीतच असतो. अजून कर काम जरावेळ. अजून सूर्य कललाही नाही पश्चिमेला, असं सांगून जास्तिचे काम करवून घेण्याची तक्रार मजूरही करतातच की. प्रत्येकाची बाजू असते हे मात्र खरं.

जगदीशचे म्हणणे खरे होते. प्रत्येकाला स्वत:ची एक बाजू असतेच. 'यातूनच वर्गलढा सुरू झाला,' मी म्हटले. त्यावर जगदीश क्षणभर थांबला. म्हणाला, यावर एक चांगलं सोल्युशन मी काढलं होतं. पण ते चाललं नाही.
"नेमकं काय सोल्युशन होतं?" मी विचारलं तसा जगदीश सांगू लागला...

पाच किलोमीटर परिसरात ऐकू जाईल, असा एक सायरन मी सुरू केला होता. मजुरांनी काम सुरू करायच्या वेळी, जेवायची सुटी करायच्या वेळी, जेवणानंतर काम सुरू करायच्या वेळी आणि काम संपवायच्या वेळी हा सायरन वाजवला जायचा. ती वेळ मजुरांनीही पाळायची आणि शेतकऱ्यांनीही, अशी कल्पना होती. त्यासाठी आमच्या संस्थेकडे शेतमजुरांनी त्यांच्या कामाच्या वैशिष्ट्यासह नोंदणी करायची होती. ज्या शेतकऱ्याला ज्या पद्धतीच्या कामासाठी मजूर लागतील त्याची मागणी त्या शेतकऱ्याने आमच्याकडे करायची. त्यावर उपलब्ध शेतमजुरांचे नंबर त्यांना दिले जायचे. त्यांनी त्या मजुराला फोन करायचा किंवा एसेमेस करायचा. तो मजूर वेळेवर शेतात हजर होईल, अशी ही कल्पना होती. पुढे हे काम तालुका पातळीवर करायचे आणि त्याचे हब सेंटर तुळजापूरला ठेवायचे, असेही मी ठरवले होते. पण  ते सक्सेस झाले नाही. ही पद्धत मजुरांनाही नको होती आणि शेतकऱ्यांनाही. त्यामुळे लवकरच ही सेवा बंद पडली.

किती छान कल्पना होती ही! पण शेतकऱ्यांना त्यासाठी एका मजुरामागे दोन रुपये एवढे अल्प शुल्कही भरायचे नव्हते. शेतमजुरांनाही असे वेळ बांधून काम करायला नको होते. त्यामुळे पहिले पाढे ..पुन्हा सुरू झाले आहेत. आजही शेतकरी मजुरांच्या नावाने आणि मजूर शेतकऱ्यांच्या नावाने ओरडतो आहे. अशाने सुधारणा कशी होणार? यामुळेच कदाचित कम्युनिस्ट पक्ष आपल्याकडे टीकाव धरु शकला नसेल, नाही का?

Sunday, April 7, 2019

मोदींनी काँग्रेस ऐवजी शरद पवारांवर का टीका केली? Why Modi Targeted Sharad Pawar in Wardha?

०१९ च्या निवडणुकीसाठीची नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातली पहिली सभा झाली ती वर्धात. त्या सभेत मोदींनी काँग्रेस आणि राहूल गांधी यांच्या विषयी चकार शब्दही काढला नाही. ते बाेलले शरद पवारांविषयी. याचा अर्थ त्यांना काँंग्रेसला दुर्लक्षून मारायचे होते, काँग्रेस लढतीतच नाही असा संदेश द्यायचा होता असे विश्लेषण करण्यात येते आहे.
वस्तुस्थिती काय आहे, हे जरा तपासून पाहू. 


यंदाच्या निवडणुकीत मोदींना बहुमत नाही मिळाले तर कोणाला मिळण्याची शक्यता आहे? कदाचित कोणालाच नाही. पण अशा अवस्थेत भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष कोणता असू शकतो? डीएमके? माकप? भाकप? मायावतींचा बसप? सपा? तृणमुल काँग्रेस की महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काँग्रेस? अर्थात, यापैकी कोणीही नाही. कारण यापैकी कोणत्याही पक्षाकडून देशातल्या सर्व राज्यात निवडणूक लढवली जाण्याची शक्यात नाही. सर्व राज्यात निवडणूक् लढवू शकणारा भाजप नंतरचा एकमेव पक्ष आहे काँग्रेस. असे असताना नरेंद्र मोदींनी काँग्रेसकडे दुर्लक्ष करून त्या पक्षाला मारायचे ठरवले तरी तो मरणार आहे का? आणि समजा ती शक्यता असती तर मोदींनी महाराष्ट्र वगळता अन्यत्रही काँग्रेस संदर्भात तेच धोरण ठेवले असते. पण तसे ते करीत नाहीत. महाराष्ट्राच्या बाहेर होणाऱ्या सभांमध्ये त्यांनी काँग्रेस अाणि राहूल गांधी यांच्यावर सडकून टीका केलेली आहेच. मग ते महाराष्ट्रातच काँग्रेस विषयी का नसतील बोलले?

महाराष्ट्रातील राजकीय स्थिती त्यासाठी लक्षात घ्यावी लागेल. मागच्या म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागांवर विजय मिळाला. त्यामुळेच गुजराथ, राजस्थान या राज्यांप्रमाणे आपले संपूर्ण राज्य भाजपमय होण्याऐवजी सहा जागा विरोधी पक्षांकडे गेल्या आणि भाजप ४२ जागांपुरता मर्यादित राहिला. खरे तर त्याच वेळी राज्यात संदेश गेला होता की, इथे भाजपविरोधात त्यातल्या त्यात कोण ताकदवान असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आहे, काँॅग्रेस नाही. महाराष्ट्राचा विचार केला तर तसाही काँग्रेस पक्ष इथे मरणप्रायच आहे. समजा यावेळी मोदी सरकार विरोधात अॅण्टी इन्कम्बन्सी असेल आणि मागच्या वेळच्या तुलनेत विरोधी पक्षांच्या जागा वाढणार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच अधिक वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे जो अधिक बलवान शत्रू, त्याच्यावर लक्ष केंद्रीत करायचे, अशी ही स्टॅटीजी असू शकते. आपण देशभरातील मोदी विरोधकांना एकत्र करण्यात पुढाकार घेतला म्हणून मोदींनी आपल्यावर वैयक्तिक टीका केली, असे शरद पवार म्हणत असले तरी वास्तव महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. समजा शिवसेना-भाजप युती झाली नसती तर मोदींनी टीका कोणावर केली असती? अर्थातच, शिवसेनेवर. मग त्यांनी भाषणात अप्रत्यक्षपणेही शरद पवार यांचा उल्लेख केला नसता हे नक्की. जसे तामीळनाडूत गेल्यानंतर ते डाव्यांच्या वक्तव्यांकडे लक्ष देण्याऐवजी आक्रमण करतात ते ममता बॅनर्जींवर.

राजकीय फंडा :  शत्रुशी लढताना त्याला मदत करणाऱ्या राजांना, देशांना एकेकटे गाठून नामोहरम केले तर मुख्य शत्रुची ताकद आपोआपच कमी होते आणि त्याच्यावर युद्धात मात करणे सोपे जाते.