Sunday, August 30, 2015

संकटाच्या हवाली होण्याची अपराधी वाट

औरंगाबादजवळ असलेल्या सुंदरवाडी गावाजवळ गुरूवारी अर्थात, २७ आॅगस्टच्या रात्री एका नोकरदार तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. त्या निमित्ताने माहिती घेत असताना या आधीही तिथे असेच प्रकार घडले असल्याची बाब समोर आली. त्यामुळे त्या संदर्भात रविवारच्या दिव्य मराठीच्या सिटी पूल आऊटमध्ये भाष्य लिहीले. ते असे..

औरंगाबादजवळच्या सुंदरवाडीला गुरुवारी रात्री आणि त्याआधीही झालेले अत्यंत घृणास्पद प्रकार घडायला नकोच होते; पण असल्या प्रकारांसाठी पोिलसांना दोष देण्यात आणि हे शहर महिलांसाठी असुरक्षित झाले अाहे असा डांगोरा पिटण्यात मुळीच अर्थ नाही. िनर्जन आणि अंधाऱ्या जागी पोिलसांनी पहारा करीत बसावे, अशी अपेक्षा कोणी कशी करू शकतो? अशा निर्जन जागी एकांत शोधत गेलेल्या जोडप्यांबाबत असे प्रकार घडणारे हे काही एकमेव शहर नाही. ही गुन्हेगारांची पाठराखण नाही आणि समर्थन तर मुळीच नाही; पण वस्तुस्थितीपासून आपल्याला दूरही जाता येणार नाही. अशा निर्जन आणि अंधाऱ्या िठकाणी आपल्याला धोका होऊ शकतो असा साधा विचारही या एकांताच्या पाठी लागलेल्या जोडप्यांच्या मनाला शिवू नये? समाजाला अंधारात ठेवण्यासाठी आपण स्वत:ला अंधाराच्या आणि पर्यायाने संकटाच्या हवाली करीत आहोत, याचे भानही त्यांना राहू नये? याच परिसरात मारहाण, लूट आणि विनयभंग होऊनही आधी अनेकांनी तक्रारी केल्या नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. घडलेला अत्याचारही अंधारात ठेवण्याची ही धडपड ज्या अपराधी भावनेतून केली जाते तोच अपराध अशा कृत्यांना खतपाणी घालतो आहे. सुंदरवाडीतील ही निर्जन जागा अशा बाबतीतली शहराजवळची एकमेव जागा नसावी. शहरातील अन्य जागीही एकांत शोधायला जोडपी जात असतील आणि तिथेही असे अंधारातच ठेवलेले प्रकार घडलेही असतील. आपल्याला लागलेली ठेच कोणी सांगत नाही म्हणून मागचा पुन्हा ठेचाळतो आणि त्यानंतरचाही. गुरुवारी रात्री झालेला प्रकारही त्या जोडप्याने अंधारात ठेवला असता तर पुढेही कदाचित असे प्रकार घडत राहिले असते. त्यामुळे फिर्याद देण्याची हिंमत दाखवल्याबद्दल त्या पीडित जोडप्याला औरंगाबादकरांनी मनोमन धन्यवादच द्यायला हवेत. पोिलसांनी पहारा करावा, अशी अपेक्षा नसली तरी पोिलसांचे खबरे, गुप्तवार्ता देणारी यंत्रणा अलीकडे मोडकळीस निघाली असावी, अशी शंका असल्या प्रकारांमुळे येते. अन्यथा असे घृणास्पद गुन्हे बंद करण्यासाठी पोिलसांना फिर्याद येण्याची वाट पाहावी लागली नसती.

Sunday, August 9, 2015

जागतिक बॅंक, पाकिस्तान आणि माधवराव चितळे

मित्रांनो,
दिनांक ९ आॅगस्ट २०१५ च्या दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांचे मनोगत प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्याचे शब्दांकन करायची संधी मला मिळाली. जागेअभावी रसिकमध्ये हे मनोगत कापले गेले आहे. ते सविस्तर वाचता यावे यासाठी या ब्लाॅगवर देत आहे.
--------------------------------------------------------------------------------------

माधव चितळे

पाणी या विषयाकडे मी कसा आकर्षित झालो, याचा धांडोळा घेताना त्याची बिजं माझ्या बालपणात चाळीसगावला घालवलेल्या िदवसांत मला सापडतात. माझे वडील वकील होते आणि वेगवेगळ्या क्षेत्रीय पाहाणीसाठी जाताना ते मला सोबत घेऊन जात. त्यांचे बोट धरून चालताना शेती, कालवे, सिंचनाचे पाणी यांच्याशी माझा परिचय होत गेला. ब्रिटीशांच्या काळात जे पहिले बंधारे बांधले गेले त्यात चाळीसगावजवळच्या जामद्याला गिरणा नदीवर असलेल्या बंधाऱ्याचा समावेश होतो. १८६८ साली हा बंधारा बांधण्यात आला होता आणि त्याद्वारे होणारे सिंचन त्या वेळी फार महत्वाचे होते. चाळीसगाव त्यावेळी श्रीमंत गाव असण्याचे कारणच हा बंधारा होता. त्यावेळी चाळीसगावातले रस्ते सिमेंटचे होते. वस्ती कमी; पण गाव समृद्ध होतं. सिंचनाखालची शेती आणि कोरडवाहू शेती यातला फरक मला िदसत होता.
शालांत परीक्षेत मी महाराष्ट्रात दुसरा आलो होतो. त्यामुळे मी भारतीय प्रशासन सेवेत जावं, असं माझ्या बहुतांश नातलगांना वाटत होतं. माझ्या वडिलांचे विचार मात्र वेगळे होते. नुकतिच पहिली पंचवार्षिक योजना जाहीर झाली होती आणि त्यामुळे सगळीकडे विकासाची चर्चा सुरू होती. देश उभारणीची चर्चा होती. त्यामुळे येणाऱ्या काळात देशाला चांगले तंत्रज्ञ, अभियंते यांची आवश्यकता आहे, असे माझ्या वडिलांचे म्हणणे होते. स्वाभाविकच मी अभियांत्रिकीला जावं, असा त्यांचा सल्ला होता. मलाही तो पटला आणि मी स्थापत्त्य अभियांत्रिकीसाठी पुण्याला प्रवेश घेतला. त्यावेळी एक चांगलं होतं. सरकारी नोकरीतले अधिकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवायला येत. अमीन भावी हे त्यापैकीच एक. अत्यंत हुशार आणि दूरदर्शी. त्यांचे माझ्या आयुष्याला दिशा देण्यातले योगदान महत्वाचे राहीले आहे. बीईच्या शेवटच्या वर्षाला असताना मी स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज केले. केंद्रीय अभियांत्रिकी सेवेसाठी आणि राज्य सेवेसाठीही या परीक्षा होत होत्या. मी दोन्ही परीक्षा दिल्या आणि उत्तम गुणांनी उत्तीर्णही झालो. त्यामुळे एकाच वेळी मिलीटरी इंिजनिअरींग सर्व्हीसेस, सेंट्रल पीडब्ल्यूडी आणि रेल्वे इंिजनिअरींग सर्व्हीससाठी मी पात्र ठरलो तसाच राज्य सेवेसाठीही निवडला गेलो.

असा आत्मविश्वास निर्माण केला
मी राज्यातच सेवा द्यावी, असा सल्ला अमीन भावी यांनी मला दिला आणि तो मी स्वीकारलाही. पण परीक्षेचा अर्ज भरतानाचा एक प्रसंग आठवतो. विद्यार्थ्यात आत्मविश्वास निर्माण करणे म्हणजे काय, याचे हे उदाहरण आहे. राज्यात क्लास वन आणि क्लास टू पदांसाठी एकच परीक्षा होती. ‘बाॅम्बे सर्व्हीस आॅफ इंिजनियर्स क्लास वन अॅण्ड क्लास टू काॅम्पिटीटीव एक्झामिनेशन’असे तिचे नाव होते. मला अमीन भावींनी बोलावून घेतलं आणि सांगितलं की या अर्जावर स्पष्टपणे लिही, ‘काॅम्पीटींग ओन्ली फाॅर क्लास वन पोस्ट’. मी तसं िलहीलं. लेखी परीक्षेत भरपूर गूण िमळाले. मुलाखतीच्या वेळी त्या ओळीवरूनच प्रश्न विचारले गेले. मी माझ्यातला आत्मविश्वास बोलण्यातूनही दाखवला. त्यामुळे तिथेही भरपूर गूण मिळाले. पुढे अनेक वर्ष त्या गुणांची बरोबरी कोणाला करता आली नव्हती.
माझ्यासाठी केंद्रात उत्तमोत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध असताना मला अमीन भावींनी मुद्दाम राज्यातली नोकरी स्वीकारायला सांगितली. केंद्रातल्या नोकरीपेक्षा त्यावेळी राज्यातल्या नाेकरीत ६५ टक्केच पगार िमळत होता. पण एक्झिक्युशन राज्यातच होत असल्याने त्यांचा सल्ला महत्वाचा ठरला. मी राज्याच्या सेवेत दाखल झालो. आधी सेट्रल डिझायनिंग आॅर्गनायझेशनमध्ये होतो. पहिली दोन वर्ष प्रोबेशनवर असताना राज्यभर िफरत होतो. त्यावेळी अमीन यांनीच मला कोयना प्रकल्पाचे अभियंता चाफेकर यांच्याकडे पाठवले. त्यांनी मुलभूत सुविधांचे महत्व मान्य करतानाच समृद्धीचेही महत्व सांगितले. ते म्हणाले, मूलभूत सुविधा तर असल्याच पाहिजेत; पण त्या असणं वेगळं आणि समृद्धी असणं वेगळं. आपल्याकडे समृद्धी येणे ही बाब आपण पाणी कसे हाताळतो यावर अवलंबून राहाणार आहे. आणि त्यांच्या आग्रहावरून मी पाण्यासाठीच्या कामांकडे वळालो.

अभियांत्रिकीचा कस लागला
अभियंता म्हणून माझा पहिला कस लागला तो मुळा धरणाच्या उभारणीत. ब्रिटीशांनी त्यांच्या काळात घाटधर, भंडारदरा अशी काही मोठी धरणं बांधायला सुरूवात केली होती. त्याच यादीत अहमदनगर जिल्ह्यातले मुळा धरणही होते. पण ते सारखे लांबत राहिले होतं. घाटधर आणि भंडारदरा पूर्ण झाले; पण मुळाची गाडी अडली होती. कारण त्या धरणाच्या जागी नदीपात्रातला खडक ३० मीटर म्हणजे १०० फूट खाेल होता. त्यावेळी या खडकापर्यंत पाेहोचायचे तंत्र उपलब्ध नसल्याने धरण अडले होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर प्राधान्याने हे धरण हाती घेण्यात आले. युरोपमध्ये हे तंत्र उपलब्ध असल्याने एका स्वीस कंपनीला ठेका िदला गेला. फ्रान्सचे चीफ इंजिनियर कंसल्टंट होते. त्यांनी आपल्या तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी काही शासकीय अधिकाऱ्यांना तिकडे नेले. प्रक्षिक्षण िदले; पण त्यांना पाया अभेद्य करता येईना. हे काम कोण सांभाळेल, असा प्रश्न पडला तेव्हा तत्कालीन मंत्री शंकरराव चव्हाण यांनी माझे नाव सुचवले. त्यावेळी साॅईल मेकॅनिक्स हा विषय इंजिनियरिंगमध्ये शिकवला जात नव्हता आणि आपण एकदम खूप धरणं बांधायला घेतली होती. ती सगळी मातीची होती. त्यामुळे ते तंत्र शिकून ते काम उभे करणारी पिढी तयार करणे हे सरकार समोरचे पहिले आव्हान होते. ते आव्हान पेलणारा महाराष्ट्रात जो पहिला गट तयार झाला त्यात मी होतो. शंकररावांचे आमच्याकडे लक्ष होते आणि म्हणूनच त्यांनी मुळा धरणासाठी माझे नाव सुचवले.

मी जबाबदारी स्वीकारल्यावर एक बाब नव्याने लक्षात आली की या नदीची रचना वेगळी आहे. ती समजून घेण्यासाठी धरणाच्या जागेपासून तिच्या उगमापर्यंत चालत जाण्याचा निर्णय मी घेतला आणि सहकार्यांसह हरिश्चंद्र गडापर्यंत ८९ किलो मीटर्स चालत गेलो. परत आल्यावर कळालं की इथली जिओलाॅजी वेगळी आहे. युरोपातल्या पुस्तकांमध्ये ती सापडत नाही. मग पुन्हा काॅलेजला जाऊन जिओलाॅजीच्या प्राध्यापकांना भेटलो. त्यांच्यासाठीही ते नवीन होते. काॅलेजनेही मग आमच्याबरोबर काम सुरू केले. राहूरी परिसरातल्या शाळेत जाऊन गणित आणि विज्ञान विषयाची जाण असलेल्या ११ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून १२-१५ मुले निवडली. त्यांना मराठीतून आवश्यक तेवढे प्रशिक्षण िदले आणि मातीचे नमुने गोळा करायला पाठवले. भाषेचा प्रभाव मला तेव्हा पहिल्यांदा समजला. मराठीतून प्रशिक्षण िदल्यामुळे त्या मुलांना नीट समजले होते. त्यामुळेच या मुलांनी सिमेंट, बेंटाेनाईट, वाळू आणि लोकल क्ले यांचे असे िमश्रण शोधून काढले की पाण्याचा दाब ते सहन करू शकत होते आणि तडा गेला तरी सेल्फ सिलींग प्राॅपर्टीमुळे पुन्हा जुळत होते. पहिल्यांदाच भारतातील उपलब्ध मातीमधून असे मिश्रण शोधले गेले होते.
हा पाया मनुष्यशक्ती वापरूनच भरायचा, असे आम्ही ठरवले. महाराष्ट्र शासनानेही नंतर आदेश काढून या कामाचे चित्रिकरण करायचे ठरवले. केवळ मनुष्यशक्ती वापरूनही एकही अपघात न होता केवळ दीड मीटर रुंदीच्या चरामधले हे धोक्याचे अवघड काम पार पडले. या कामावर परिसरातलेच मजूर कामाला होते. आपण काही तरी वेगळे काम करीत आहोत याची त्यांना जाणीव झाली होती. त्यामुळेच ज्या िदवशी धरणाचा पाया सपाटीपर्यंत आला त्या दिवशी संध्याकाळी त्या महिला आणि पुरुषांनी असे काही धूंद नृत्य केले की अशी धुंदी आणि नृत्य मी पुन्हा कधी पाहिले नाही. आजही मला ते आठवते आहे. समाजातली सुप्त शक्ती काय असते हे मला त्यावेळी समजले. मराठी भाषेतून विज्ञान शिकवत नसल्यामुळे आपल्याला क्षमतांचा विस्तार करता येत नाही, हे त्या निमित्ताने अधोरेखीत झाले आहे. नंतर पुढे हे धरण पूर्ण झाले.

जागतिक बंॅकेशी घेतलेला वाईटपणा
जागतिक बंॅकेशी थेट वाईटपणा घेण्याचे प्रसंगही माझ्यावर पुढे अनेकदा आले. एवढेच काय एका दिवसासाठी जागतिक बंॅकेचा संचालकही मला होता आले. मुंबईला थेट पाणीपुरवठा करण्यासाठी भातसा नदीवर धरण प्रकल्प सरकारने हाती घेतला होता. त्याला पैसा जागतिक बंॅक पुरवणार होती. धरणातले पाणी जलवाहिनीतून मुंबईला नेण्यात येणार असल्याने एका जर्मन कंपनीने पाईप बनवण्याची फॅक्टरीही सुरू करण्याची तयारी दर्शवली होती. बंॅकेच्या सल्लागारांना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर एक कार्यालयही देण्यात आले होते. जागतिक बंॅकेचा संबंध असल्याने मला त्या प्रकल्पावर नेमण्यात आले. स्वाभाविकच माझी नियुक्तीही मंत्रालयात करण्यात आली. धरणाचे काम चांगले व्हावे असे वाटत असेल तर माझी नियुक्ती शहापूरला करा, अशी विनंती मी केली. शहापूर हे त्यावेळी ५ हजार लोकवस्तीचे गाव होते. जंगलाचा परिसर होता तो. त्यामुळे माझ्या विनंतीचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. तिथे गेल्यावर मी पहिल्यांदा तिथल्या टेकडीवर असलेल्या रेस्ट हाऊसमध्ये गेलो आणि तिथूनच मी रुजू झाल्याचे पत्र पोस्ट केले. हळूहळू त्या भागाची पाहाणी केली. नदीकाठच्या गावांना भेटी दिल्या आणि जसा हा प्रकल्प होऊ घातला आहे तसा तो होता कामा नये, हे माझ्या मनाने घेतलं. हे धरण होईल; पण त्याचे पाणी थेट जलवाहिनीने नाही तर नदीपात्रातूनच मुंबईला जाईल अाणि त्या प्रवासात नदीकाढच्या गावांनाही त्या पाण्याचा लाभ होईल, नदीकाठी सिंचन होईल आणि धरणाच्या पायथ्याशी वीज िनर्मिती होईल अशी भूमिका घेणारा बहुद्देशीय प्रकल्पाचा प्रस्ताव मी सरकारकडे पाठवला. तिथेच जागतिक बॅंकेशी पहिला संघर्ष झाला.

वसंतराव नाईक त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यांचा मोठेपणाही अनुभवायला आला. सरकारने ज्या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे, त्या आधारावर जागतिक बॅंकेशी पुढील सहकार्याचा करार केला आहे, त्या कराराप्रमाणे त्यांचे तांत्रिक सल्लागार आले आहेत, त्या प्रकल्पाच्या आधारे एका देशाने पाईप फॅक्टरीसाठी गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे, अशावेळी एक अधिकारी येतो आणि म्हणतो की दिलेली प्रशासकीय मंजुरी रद्द करा आणि मी दुसरा प्रकल्प अहवाल देतोय त्याला मान्यता द्या. प्रकल्प जागतिक बॅंकेपेक्षा आपल्याला अनुकूल असला पािहजे हे वसंतराव नाईकांना पटलं आणि त्यांनी मंजूर केलेला प्रकल्प अहवाल रद्द करून नव्या प्रस्तावाला मंजुरी िदली. जागतिक बॅंकेला ते खूप झोंबलं.

या प्रकल्पाच्या निमित्ताने आणखी एक बाब मला समजली. पर्यावरणवादी काहीही म्हणोत, इतकं मोठं जंगल असूनही फेब्रुवारी महिन्यात भातसा नदी कोरडी होत होती. जंगलात जी काही झाडे होती तिच पाण्याच्या बाबतीत आपली वाटेकरी होती. नदीचं पाणी तीच पिऊन जात होती. मला वाटतं, जे केवळ जंगलामुळे पाणी टिकून राहाते असे म्हणतात, त्यांनी जंगलात प्रत्यक्ष जाऊन वस्तुस्थिती समजूनच घेतलेली नाही.

जागतिक बॅंकेशी पुन्हा तणावाचा संबंध आला तो सरदार सरोवर या नर्मदेवरील प्रकल्पामुळे. त्यावेळी युरोपात ग्रीन पार्टीचं प्राबल्य वाढत होतं. त्यामुळे जागतिक बॅंकेने या प्रकल्पात सहभागी होताना अनेक अटी घातल्या होत्या. त्यामुळे अडचणी वाढल्या होत्या. त्यावेळी केंद्रीय जलआयोगाचा मी चेअरमन होतो. केंद्र सरकारने मला अाणि तत्कालिन सचिव नरेशचंद्र यांना जागतिक बॅंकेशी बोलण्यासाठी पाठवलं. नरेशचंद्र यांनी पहिल्यांदा बॅंकेच्या संचालक मंडळासमोर भूमिका मांडली. आम्ही पर्यावरणाची कशी काळजी घेत आहोत, हे त्यांनी सांगितलं. भारतातली या बाबतीतली पूर्व तयारी तांत्रिक उच्चाधिकारी असलेल्या केंद्रीय जलआयोगाचे अध्यक्ष अधिक सांगतील, असे सांगून त्यांनी माझ्याकडे सुत्रं दिली. मी बॅंकेच्या संचालकांना म्हणालो की, हा प्रकल्प करायचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. तुम्ही बरोबर आलात तर तुमच्यासह आणि नाही आलात तर तुमच्या शिवाय. तुम्ही सोबत असाल तर १० वर्षात प्रकल्प पूर्ण होईल आणि नसाल तर कदाचित १५ वर्ष लागतील एवढेच. त्यामुळे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की, या महान प्रकल्पाच्या निर्मितीच्या श्रेयाचे वाटेकरी व्हायचे की नाही ते. माझ्या या बोलण्याचा परिणाम जागतिक बॅंकेच्या संचालकांवर झाला आणि संचालक सकारात्मक झाले.

भारताच्यावतीने एक संचालक जागतिक बॅंकेवर असतात. हा विषय बॅंकेच्या संचालक मंडळासमोर मंजुरीसाठी येईल तेव्हा यातले वादग्रस्त तपशील नीट समजावून सांगणे मला तितक्या प्रभावीपणे जमणार नाही, अशी भूमिका तत्कालीन भारतीय संचालकांनी घेतली. त्यामुळे ज्या दिवशी हा विषय असेल त्या दिवसापुरते जागतिक बॅंकेचे भारतीय प्रतिनिधी संचालक म्हणून माधव चितळे असतील, असे सरकारने जागतिक बंॅकेला कळवले. त्यामुळे एक दिवस जागतिक बॅंकेचा संचालक म्हणून चर्चेत सहभागी होण्याची संधी मला िमळाली. नंतर याच बॅंकेच्या फायनान्सिंग युनिटसमोर भारताचे म्हणणे मांडण्यासाठी मला पॅरिसला बोलावण्यात आले. मी आणि बॅंकेचे व्हाईस चेअरमन तिथे बैठकीच्या कार्यालयात जात असताना कार्यालयासमोर ग्रीन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. पर्यावरणविनाशी सरदार सरोवर प्रकल्पाला मदत देण्याच्या बॅंकेच्या निर्णयाविरोधात ते आंदोलन करीत होते. व्हाईस चेअरमन म्हणाले की, आता काय करायचं? मी सांगितलं की, बॅंकेच्या िनयमांना थोडी मुरड घालून यांच्यापैकी एकाला आपल्या बैठकीत निरीक्षक म्हणून उपस्थित राहायची परवानगी दिली तर अनुकूल परिणाम होईल, असे मला वाटते. त्यांनी तसे केले. त्यामुळे एक तर निदर्शने थांबली आणि दुसरे म्हणजे बैठकीतली आमची चर्चा ऐकून त्यांचे मतपरिर्तन झाले. शांतपणे त्यांनी आपला विरोध मागे घेतला.

सॅन्ड्रा पोस्टेल ही जागतिक कीर्तीची पर्यावरणवादी लेखिका आहे. पिलर्स आॅफ सॅण्ड या पुस्तकातून सर्वात आधी तिने मोठ्या सिंचन प्रकल्पांना आणि धरणांना विरोध सुरू केला होता. तीने मान्ट्रीयल येथे जागतिक जलपरिसंवादात  ‘स्वयंसेवी संस्थांचा जलव्यवस्थापनातील सहभाग’ या विषयावरचे माझे भाषण ऐकले आणि माझ्या पत्नीला म्हणाली की, तुम्हाला तुमच्या पतीचा किती अभिमान वाटत असेल?. ती असं म्हणाली, कारण ती बुद्धी प्रामाण्यवादी होती. आपल्याकडच्या पर्यावरणवाद्यांच्या बाबतीत असा अनुभव फारसा कधी आला नाही. दुर्दैवाने आपल्याकडे तो विषय शास्त्रीय न राहाता भावनिक केला गेला आहे. केवळ चळवळीचा विषय म्हणून त्याकडे पाहिले जाते आहे. असे विषय हाताळण्यासाठी जो व्यापक व्यवहारी दृष्टिकोन असला पाहिजे तो आपण अजूनही वाढवू शकलेलो नाही.

पाणी करार आणि पाकिस्तानचे अनुभव
नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी मला शेजारच्या राष्ट्रांशी पाणी सामंजस्य घडवून आणण्यासाठी प्रोत्साहित केले. तुम्ही आवश्यक ते करा, मी तुमच्या पाठीशी आहे असे ते म्हणत. त्यामुळेच नेपाळ, भूतान, बांगलादेश, पािकस्तान या देशांशी आपण पाणी वापरासाठी सामंजस्य निर्माण करू शकलो आणि म्हणूनच त्या बाबतीत आज या विषयावर फारसे तणाव नाहीत. बांगलादेशाबरोबर पाण्याची चर्चा करण्याची पूर्वपिठीका म्हणून मला बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष इर्शाद यांच्याशी एकट्यानेच चर्चा करण्यासाठी पाठवले गेले. अशाच प्रकारच्या एका चर्चेसाठी पाकिस्तानात जाताना लाहोर विमानतळावर आम्ही . उतरलो तर ‘िचतळे गो बॅक’ असे फलक दाखवण्यात आले आणि घोषणा िदल्या गेल्या. त्याला कारण होते. भारत हा फेडरल देश नसून युनियन आॅफ स्टेट्स आहे हे स्पष्ट करून मी जम्मू काश्मीरच्या जलसंधारण विभागाच्या सचिवांना साेबत नेण्याचा आग्रह धरला होता. माझे म्हणणे पटल्यामुळे त्यांनाही माझ्यासोबत नेण्यासाठी पाकिस्तानकडून स्वीकृती देण्यात आली. पािकस्तानमधील अनेकांना तसे नको होते आणि म्हणून पाकिस्तानमध्ये आमच्या शिष्टमंडळाला विरोध चालला होता. पण नंतर ही बोलणीही सहजपणे पूर्ण झाली.

पुढे तर पािकस्तानशी खूप चांगले संबंध वाढले.  िदल्लीहून कायम स्वरुपी राहायला येण्यासाठी म्हणून मी औरंगाबादला आलो होतो. त्यानंतर दोनच महिन्यांनी अचानक फोन आला की, ग्लोबल वाॅटर पार्टनरशीप या संस्थेची बैठक आहे आणि त्यासाठी तुम्ही काेलंबोला आलं पाहिजे. आग्रह केल्यामुळे मी त्या बैठकीला गेलो. ितथे त्या संस्थेच्या दक्षिण आशियाई विभागाचा अध्यक्ष निवडायचा होता. पाकिस्तानने बैठकीत भूमिका घेतली की, माधव चितळेंना अध्यक्ष केले तर आम्ही आशियाई व्यवस्थेत सहभागी होऊ.  त्यावेळी औरंगाबादला येऊन काही कामं मी ठरवली होती आणि तशा कमिटमेंट केल्या होत्या. त्यामुळे औरंगाबादला राहाणे मला आवश्यक होते. अशा परिस्थितीत हे अध्यक्षपद घ्यायला मी असमर्थता व्यक्त केली. खूपच आग्रह झाला तेव्हा अट टाकली की, हे दक्षिण आशियाई अध्यक्षांचे कार्यालय औरंगाबादला वाल्मी (वाॅटर अॅण्ड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टीट्यूट)मध्ये  ठेवले तरच मी अध्यक्षपद घेईन. तेही मान्य केले गेले.
त्याच अध्यक्षपदावर असताना संस्थेची एक बैठक पुण्याला आयोजित केली होती. त्या बैठकीला पाकिस्तानच्या सीमी कमाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिनिधी आले होते. बैठक सुरू झाली तेव्हा सीमी कमाल नाराज दिसत होत्या. मध्यांतरात मी त्यांना त्या बाबत विचारले. त्या म्हणाल्या, हो. मी नाराज आहे. कारण आज राखी पौर्णिमा आहे आणि तुम्ही राखी न बांधताच बैठक सुरू केली आहे. पािकस्तानी अनेक बुद्धीवंत आणि नागरिक यांचा भारताकडे पाहाण्याचा सामािजक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन कसा आहे, हे कळायला ही बाब पुरेशी आहे, असे मला वाटते.

चौकट –
पाच पंतप्रधानांचा सहवास
मला केंद्रात काम करताना पाच पंतप्रधानांचा सहवास िमळाला. राजीव गांधी, नरसिंहराव, चंद्रशेखर, इंद्रकुमार गुजराल आणि व्ही.पी.सिंग. यात सर्वाधिक सहवास राजीव गांधी आणि नरसिंहराव यांचा होता. ते बऱ्याचदा अनौपचारीकपणे वागत. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेेवक आहे याची त्या सर्वांना पूर्ण जाणीव होती. मीही कधी माझी संघाची विचारधारा लपवली नाही. तरीही त्यांनी त्या बाबतीत कधी अडचण दाखवली नाही. काॅंग्रेसचे असूनही राजीव गांधी आणि नरसिंह राव माझ्याशी संघ या विषयावर अनेकदा बोलत. माझ्या कामावर किंवा माझ्या प्रतिमेवर मी संघाचा असण्याचा काहीही परिणाम झाल्याचे मला कधी जाणवले नाही.

(शब्दांकन- दीपक पटवे)

Sunday, August 2, 2015

दृश्यम; बरंच अदृश्य जे सहज दिसतं...




आज पुन्हा एक चित्रपट थिएटरमध्ये जाऊन कार्यालयीन सहकार्यांसह पाहाण्याचा उत्तम योग जुळून आला. ट्रेलर पाहिलं तेव्हाच चित्रपट पाहायचा निर्णय झाला होता. निर्णय होऊन प्रत्यक्ष चित्रपट पाहायला जाण्याचा प्रसंग मात्र विरळा. चित्रपट संपला तेव्हा दिग्दर्शकाने एक मस्त 'पंच' दिलेला होता प्रेक्षकांना.

मानवी मनाच्या स्मृतीपटलावर अक्षरं किंवा ध्वनीपेक्षा दृश्य अधिक खोलवर कोरलं जातं आणि तेच चटकन आठवतं ही साधी मानसशास्त्रीय संकल्पना या चित्रपटाच्या शिर्षकाच्या मुळाशी आहे. या मानसशास्त्रीय सत्याचा उपयोग या चित्रपटाचा नायक (की खलनायक हे ज्याने त्याने ठरवावं) एक खून लपवण्यासाठी कशा खुबीने करत राहातो, हे दिग्दर्शकाने उत्तमरित्या दाखवलं आहे. बाकी कथानक, दिग्दर्शन, अभिनय या विषयी मुद्दाम जास्त लिहीत नाही. कारण एक तर तो माझा प्रांत नाही आणि त्या अनुशंगाने खूप काही लिहून आलंच आहे.
बरंच अदृश्य जे सहज दिसतं.. असं जे मी शिर्षकात म्हटलं आहे त्या विषयीच आज लिहायचं आहे.

हा चित्रपट पाहिल्यावर खून कसा लपवावा याचं प्रशिक्षणच मिळतं, अशी काहींची प्रतिक्रिया येते. ज्याने काहीच वाचलेलं नाही त्याला जर कोणी तरी एक किंवा दोन ओळीत चित्रपटाची कथा सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याचा  असाच समज होण्याची शक्यता अधिक आहे. एवढंच काय, पोलिस महानिरीक्षक असलेली तब्बू देखील चित्रपट पाहून गुन्हा करण्याची शक्यता एक पोलिस अधिकारी म्हणून याच चित्रपटात व्यक्त करताना दाखवलेली आहे; पण माझी अनुभुती मात्र अगदी वेगळी होती. गुन्हेगाराने गुन्हा लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी पोलिसांची 'नजर' त्याला कशी शोधते, हे अधिक जोरकसपणे या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर बिंबवले जाते, असे मला वाटते. खदानीतल्या तलावात बुडवलेली गाडी सापडली असे सांगताना एक पोलिस अधिकारी अजय देवगणच्या हालचाली टिपतो हे दृश्य तर त्याची केवळ वरवरची झलक आहे. साळगावकर कुटुंबियांच्या जबाबातला ठामपणा, अगदीच निष्पाप वयात असतानाही न चुकता दिलेली उत्तरं आणि त्यामुळे  कोणताही पुरावा सापडत नसताना, संशयाच्या विरोधात जाणारेच साक्षी आणि पुरावे असतानाही घटनेचा आयजी असलेल्या तब्बुने लावलेला बिनचूक अंदाज माझ्या वरच्या विधानाचा प्रत्यय देताे. त्यामुळे पोलिसांना कसं मुर्ख बनवता येतं हे नाही, तर ते किती हुशार असतात हेच चित्रपट पाहाताना मनावर बिंबत जातं.

टीनएजर मुलींच्या बाबतीत समवयस्क मुलांकडून किंवा वयस्क पुरूषांकडूनही होणाऱ्या गैरवर्तनाला कशा रितीने सामोरे जायचे नाही, हेही हा चित्रपट प्रभावीपणे सांगून जातो. अर्थात, या संदर्भात प्रबोधन करणारं एक वाक्यही या चित्रपटात नाही तरीही.  तिच बाब रात्री घराबाहेर राहाणाऱ्या कर्त्या माणसांनी काय करायला नको हे अधोरखीत करण्याच्या बाबतीतही म्हणता येईल. एकुलते एक असलेल्या पाल्यांचे अती लाड काय परीणाम घडवतात, यावरही अत्यंत मार्मिक भाष्य दिग्दर्शकाने सहजपणे केले आहे. भ्रष्ट पोलिस अधिकारी दाखवताना पोलिसांतला प्रामाणिक चेहराही जाणीवपूर्वक समोर ठेवला गेला आहे.

असे असले तरी कुटुंबासाठी काहीही करण्याचे, अगदी सदोष मनुष्यवधासारख्या गंभीर घटनेचे पुरावे नष्ट करण्यापासून पोलिसांची सतत दिशाभूल करण्यापर्यंतच्या गुन्ह्याचे केलेले ग्लोरिफिकेशन मात्र असमर्थनीयच म्हणायला हवे.  यातून 'फॅमिली बाऊंडींग' दाखवले गेले आहे, असे म्हणून त्याचे समर्थन करताच येणार नाही, असे मला वाटते. अर्थात, अनपेक्षितपणे किंवा अपघाताने का असेना झालेल्या मनुष्यवधाबाबत चित्रपटाचा नायक आणि त्याचे कुटुंबीय लगेचच पोलिसांना माहिती देऊन मोकळे झाले असते तर ती चित्रपटाची कथाच नव्हती. हिंदी चित्रपटातले हिरो राॅबिनहूड दाखवण्यात हिंदी प्रेक्षकांची उत्तेजना सामावलेली असेल तर बिचारा दिग्दर्शक तरी काय करेल, नाही?