Sunday, November 20, 2016



नाव न ठरलेली एक कादंबरी...

मित्रांनो, सध्या मी एक कादंबरी लिहीतो आहे. पोलिस खाते, राजकीय नेते आणि पत्रकार यांच्या वर्तणुकीवर प्रकाश पडावा अशी या कादंबरीची रचना आहे. या अजून अपूर्ण असलेल्या कादंबरीच्या आठव्या प्रकरणाची सुरूवात तुम्हाला वाचण्यासाठी म्हणून देत अाहे. कशी वाटतेय, अवश्य प्रतिक्रिया द्या....


सकाळी डाेअरबेल वाजवली तेव्हा लोणकरांना जाग आली. त्यांनी सवयीप्रमाणे आधी घड्याळ पाहिले. साडेसात वाजले होते. उठून दार उघडतात तोवर दुसऱ्यांदा बेल वाजली. त्यामुळे त्यांना रात्री अचानक आलेल्या शिरीषची आठवण झाली. आता तो नक्की नसेल, असे मनाशी म्हणत त्यांनी दार उघडलं. समोर अजय होता.
‘काय रे?’ त्यांनी विचारले. अजय काहीच न बोलता रूममध्ये आला आणि त्यानेच दरवाजा बंद करून घेतला.
‘तुमचा फोन सायलेंटवर आहे का सर?’
‘का?’
‘इन्स्पेक्टर गावितांचा माणूस आला होता आत्ता. तुम्ही फोन उचलत नाही आहात असं म्हणत होता.’
काहीही न बोलता लोणकर पलंगाजवळ गेले आणि त्यांनी फोन उचलून पाहिला. सायलेंटवर होता आणि जवळपास ७ मिस्ड काॅल्स िदसत हाेते. इन्सपेक्टर गावितांचेच असावेत असे म्हणत त्यांनी लिस्ट पाहिली. एकाच मोबाईल क्रमांकावरून ते काॅल आले होते; पण गावितांचे नव्हते. त्यांना आश्चर्य वाटले.
‘काय म्हणाला तो माणूस?’ त्यांनी अजयला विचारले.
‘तुम्ही फोन उचलत नाही आहात, असं तो म्हणाला.’
‘बस, एवढंच म्हणाला? आणि तुला कसं ओळखलं त्याने?’ लोणकरांनी अजयला विचारले.
‘मलाही नाही कळालं ते... म्हणजे अचानक माझ्याजवळ आला आणि म्हणाला तुम्ही संपादक साहेबांबरोबर आहात ना? मी हो म्हटलं. मग म्हणाला मी इन्सपेक्टर गावित साहेबांचा माणूस आहे. तुमचे साहेब फोन उचलत नाहीयेत. जाऊन सांगा त्यांना.’
‘पोलिस डिपार्टमेंटमधलाच असेल ना? म्हणजे युनिफाॅर्ममध्ये होता की..’
‘नाही. पोलिस नव्हता तो.’
‘नव्हता? तुला कसं माहिती?’
‘सर, पाच फूट उंचीचा असेल तो. केसही मोठे होते त्याचे. असा माणूस पोलिस कसा असेल?’
अजयचा तर्क बरोबर होता. लोणकरांनी तो नंबर डायल केला. दोन रिंग नंतर लगेच पलिकडून प्रतिसाद आला.
‘हॅलो. साहेब बोलताय ना?’
‘तुम्ही कोण?’
‘ओ साहेब, ऐका. तुमच्यासाठी महत्वाचा निरोप आहे. तुमचा माणूस पोलिसांच्या ताब्यात आलाय.’
‘काय! चेतन पोलिसांना मिळाला?’लोणकरांना आनंदाचा धक्काच बसला होता. त्यांचे हे वाक्य ऐकून अजयही उसळला. अभावितपणे तो लोणकरांच्या जवळ सरकला. पण पलिकडून बोलणाऱ्याला लोणकरांचे मध्येच बोलणे आवडले नाही.
‘साहेब, ओरडू नका. तो पोलिसांना सापडलाय; पण गावित साहेब ते तुम्हाला सांगायचे नाहीत. सर्व पोलिसांनाही त्यांनी तुमचा माणूस सापडल्याची माहिती तुमच्यापर्यंत जाऊ द्यायची नाही असे सक्त आदेश दिले आहेत. म्हटलं तुम्हाला सांगून द्यावं.’
‘तुम्ही कोण आहात? तुम्ही तर गावितांकडूनच बोलताय ना?’ लोणकरांना नेमकं कोण ही माहिती देतयं हे समजत नव्हतं.
‘मी तुमचा सदीच्छावाला आहे असं समजा. बाकी माहिती तुम्ही काढून घ्या’ पलिकडून एवढंच वाक्य आलं आणि फोन बंद झाला. सदिच्छावाला हा शब्द त्यांना खटकला.
‘चेतनसर मिळाले सर?’ अजयने फोन बंद झाल्याचे लक्षात येताच लोणकरांकडे आपली उत्सुकता व्यक्त केली.
‘मला कळत नाहीये, चेतन सापडला म्हणतोय आणि इन्सपेक्टर गावितांनी ही माहिती माझ्यापासून दडवून ठेवायला सांगितली आहे असेही म्हणतोय आणि तरी मला फोन करून सांगताये. काय खरं आहे काय माहिती...’ स्वत:शीच बोलावे तसे लोणकर बोलत होते.
सोफ्यावर बसत त्यांनी अजयला टीव्ही लावायला सांगितले आणि त्यांनी इन्सपेक्टर गावितांचा फोन डायल केला. अजयने न्यूज चॅनल लावले होते. त्यावर सकाळच्या बातम्या सुरू होत्या. गावितांचा फोन बराचवेळ कोणी घेतलाच नाही. अगदी शेवटच्या क्षणी तो उचलला गेला. पलिकडून आवाज आला,
‘जयहिंद. हेड काॅन्स्टेबल नाईक बोलतोय.’
‘हा गावित साहेबांचा फोन आहे ना ?’ लोणकरांनी थेटच प्रश्न केला.
‘आपण कोण बोलताय?’ नाईकांनी तिकडून विचारले.
‘मी त्यांचा मित्र बोलतोय. मला त्यांच्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे. त्यांना द्या ना फोन’
‘आपलं नाव कळू शकेल का सर? ’
‘मी पाटील बोलतोय मुंबईहून’ लोणकरांनी खोटंच सांगितलं.
‘सर, गावित सर कामात अाहे. ते आता फोन घेऊ शकत नाही.’
‘हॅलो, पण आता कुठे आहेत ते?’ लोणकरांनी गावितांना भेटायला जायची तयारी त्या क्षणी केली.
‘मी सांगू शकत नाही. जयहिंद’ असे म्हणून हेडकाॅन्स्टेबल नाईकांनी फोन कट केला. लोणकरांची अस्वस्थता वाढू लागली होती. त्यांनी अजयला पोलिस ठाण्यात जाऊन गावित तिथे आहेत का, याची माहिती काढायला सांगितले. अजय जाताच त्यांनी तोंड धुतले आणि काऊंटरवर फोन करून चहाची आॅर्डर दिली.
टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये दम नव्हता. या प्रकरणाचा काही मागमूसही त्या बातम्यांमध्ये नव्हता. अजयच्या फोनची वाट पाहाण्याशिवाय पर्याय नव्हता.
चेतन सापडला असेल तर गावित आपल्यापासून का लपवताय? उलट सर्वात आधी त्यांनी आपल्याला फोन करून माहिती द्यायला हवी होती. या शोधकार्यात आपलीच तर त्यांना सर्वात मोठी मदत झाली होती. अजयला त्याचा जुना िमत्र भेटला काय, त्याने त्याच्याकडे आलेल्या किडनॅपर टोळीच्या माणसाविषयी अजयला हिंट दिली काय, आपण गावितांना ती माहिती देण्यासाठी अजयला विश्वासात घेतले काय आणि चेतनपर्यंत पोहोचणे गािवतांना शक्य झाले काय.  सारे एकाच सुत्रात बांधले गेले आहे; पण गावित आता आपल्यापासूनच माहिती का लपवित असतील? की तो फोन फसवा होता आणि चेतन सापडलेलाच नाही पोलिसांना? पण मग अशी खोटी माहिती देण्यामागे त्या व्यक्तीचा तरी काय हेतू असू शकतो? खोटी माहिती देऊन काय मिळणार आहे त्याला?
लोणकरांचे विचारचक्र चहा घेऊन आलेल्या माणसामुळे थांबले. त्यांनी परत जाताना त्याला दार बंद करून घ्यायला सांगितले.  चहाचे दोन घोट पोटात गेल्यावर त्यांना सिगारेटची आठवण झाली. टीपाॅयवर त्यांनी पाकीट शोधले. ते खाली पडले होते. शेवटची सिगारेट त्यात होती. चहाचे घोट घेताना आणि सिगारेटचा धूर हवेत सोडताना त्यांचे विचारचक्र पुन्हा सुरू झाले. काही वेळात फोनची रिंग वाजली. अजयचाच फोन होता. त्यांनी घाईनेच फोन घेतला.
‘हं बोल अजय’
‘सर, गावित साहेब इथेच होते पोलिस स्टेशनात’
‘होते म्हणजे?’
‘आता ते डीएसपी साहेबांबरोबर कुठे तरी गेले आहेत घाईघाईने’
‘एसपी इथे आले आहेत?’
‘हो सर. दोन, तीन गाड्या होत्या पोलिस अधिकाऱ्यांच्या’
‘बरं, चेतनविषयी कोणी काही सांगतयं का, जरा प्रयत्न करून बघ’
‘केला सर मी प्रयत्न. पण मला हाकलून दिलं एका हवलदाराने. म्हटला जास्त चौकशा करशील तर आत टाकीन.’
‘थोडा वेळ तिथेच थांब. बाहेरून काही माहिती मिळतेय का ते बघ. तिथल्या हालचाली टीप. मी बोलवल्यावर इकडे ये’ लोणकरांनी अजयला सूचना दिल्या आणि फोन बंद केला.

Friday, April 29, 2016

मराठवाड्यातल्या दुष्काळाचा दाह



माधव दिनाजी कदम नावाचा २७ वर्षे वयाचा तरूण. मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील एका खेडेगावात राहाणारा. साधारण दोन हेक्टर शेती नावावर आहे. पण ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गेल्या चार वर्षापासून मराठवाड्यात दुष्काळ वाढतोच आहे. त्यावर उपाय म्हणून माधवने शेतात विहीर खोदून घेतली. जमिनीतील पाण्याची पातळी इतकी खोल गेलेली की विहिरीला पाणी लागलेच नाही. डोक्यावरचे कर्ज मात्र त्यामुळे वाढले. शेतात कापूस लावला. कापसाचे पिक चांगले आले तर कर्ज कमी होईल, ही अपेक्षा. पण पाण्याअभावी कापसाला बोंड फुटलेच नाही. सरकारने मदत जाहीर केली. पण त्यातून कापूस आणि सोयाबिन ही पिके वगळली. त्यामुळे माधव आणखीनच त्रासला. सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, यासाठी शासकीय कार्यालयात फेऱ्या मारत राहीला, पण उपयोग झाला नाही. काहीच उपाय सुचत नाही म्हणून तो २३ मार्चला मुंबईत आला. मंत्रालयाच्या दारात उभा राहून त्याने विष घेतले.  लोकांच्या लक्षात आल्यावर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण डाक्टर त्याला वाचवू शकले नाहीत. आत्महत्या करण्यापूर्वी तो आपल्या फेसबूकवर लिहून गेला होता,’ देवेंद्र सरकार, माझा जीव गेल्यावर तरी जागे व्हा!’
भीषण दुष्काळात जगणे मुश्कील झाले म्हणून आत्महत्या करणारा माधव एकटा नाही. जानेवारी ते मार्च २०१६ या तीन महिन्यात मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यात ११४ शेतकऱ्यांनी असेच जीवन संपवले आहे. अर्थात, ही संख्या शासकीय पातळीवर मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची आहे. जे पात्र ठरत नाही त्यांच्या आत्महत्यांची तर नोंदही होत नाही. कारण त्यांच्या ऐवजी त्यांच्या वडिलांच्या नावावर शेती असते किंवा त्यांनी अनधिकृत सावकाराकडून कर्ज घेतलेले असते. मंत्रालयासमोर आत्महत्या करणाऱ्या माधव कदमच्या पत्नीचे वय आहे २३ वर्षे आणि तिच्या मुलीचे वय ३ वर्षे. मुलगा तर अवघा १ वर्षाचाच आहे. प्रत्येक दिवशी अशा अनाथ होणाऱ्या कुटुंबांची संख्या मराठवाड्यात वाढतच चालली आहे. ज्यांना आत्महत्या हा मार्ग आहे असे वाटत नाही ते कुटुंबासह गाव सोडून मोठ्या शहरांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे अनेक गावातील बहुसंख्य घरांना सध्या कुलूप दिसते आहे. माणसांनाच प्यायला पाणी नाही तेव्हा दाराशी बांधलेल्या जनावरांना प्यायला पाणी कुठून आणणार? त्यामुळे अनेकांनी आपली गुरे छावण्यांमध्ये पाठवली आहेत. राज्यात गोवंशबंदी असल्याने बैल विकताही येत नाहीत आणि त्यांना पोसताही येत नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. फळबागा कोरड्या झाल्यामुळे बागवान शेतकरी अनेक वर्षे मागे फेकला गेला आहे.
बीड आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातील परिस्थिती सर्वात बिकट आहे. शेतकरी तर या परिस्थितीने प्रचंड अडचणीत आला आहेच, पण इतर व्यावसायीकही तितकेच अडणचीत आहेत. माझे अशील गेल्या १ वर्षापासून पैसे देत नाहीत. पाऊस झाल्यावर एकदम पैसे देऊ असे सांगत आहेत. त्यामुळे माझ्याकडेच पैसे नाहीत. आता कोणी मला उधारीवर किराणा माल द्यायलाही तयार होत नाही, असे एक वकील सांगत होते. टेलर, कापड दुकानदार, ग्रामीण भागातले डाक्टर्स यांचीही अशीच अवस्था आहे, यावर सहजासहजी कोणाचा विश्वास बसत नाही. पण परिस्थिती खरच खूप बिकट झाली आहे. ही आहे खेड्यातली परिस्थिती.
ज्या लातूरचे आमदार विलासराव देशमुख सुमारे आठ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या ५ लाख लोकवस्तीच्या लातूर शहरात गेल्या तीन महिन्यांपासून नळाला पाणी आलेलेच नाही. महापालिका टँकरने १० दिवसांतून एकदा थोडे थोडे पाणी आतापर्यंत पुरवत होती. शिक्षणाच्या लातूर पॅटर्नसाठी हे शहर प्रसिद्ध. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातले आणि राज्यातलेही विद्यार्थी मोठ्या संख्येने इथे शिकायला येतात. दुष्काळात पाण्याची गरज कमी व्हायला हवी म्हणून महसूल प्रशासनाने त्यांच्या परीक्षा लवकर घ्यायला लावून त्यांना शहराबाहेर जाण्याचे आदेश दिले. सुटीत चालणारे १०वी, १२ वी आणि स्पर्धा परीक्षांचे खासगी क्लासेसही बंद करायला लावले. त्यामुळे शहरातील लाखभर लोक कमी झाले आहेत.  मार्च महिन्याच्या अखेरीस पाण्याचे सर्वच स्त्रोत संपले. त्यामुळे हे संपूर्ण शहरच स्थलांतरीत करायची वेळ आली होती. ४०-५० किलो मीटर्सवर जिथे थोडे पाणी शिल्लक होते तिथे ते पाणी द्यायला स्थानिकांनी विरोध केला. पाणी देणारे आणि पाणी मागणारे यांच्यातील संघर्ष वाढत जाऊ लागला. पाण्यासाठी शहरात लोक एकमेकांच्या जीवावर उठायला लागले तसे प्रशासनाने सर्वच पाण्याच्या स्त्रोतांच्या जागी १४४ कलम जारी केले. दुष्काळाच्या संदर्भातला हा ऐतिहासिक निर्णय असावा. आजूबाजूचे सर्वच स्त्रोत संपल्यामुळे आता खास रेल्वेने लातूर शहरात पाणी आणले जाते आहे. शहराची रोजची गरज आहे ४ कोटी लीटर पाण्याची आणि रेल्वे दोन-तीन दिवसांतून एकदा आणते आहे ५ लाख लीटर पाणी. ते प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  याच लातूर परिसरात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली तीन मोठे सहकारी साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. शिवाय एक खासगी साखर कारखानाही आहे. त्यासाठी परिसरात सरासरी ४६ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड करण्यात येते. या उसाच्या पिकानेच सर्वाधिक पाणी खर्च करण्याचे काम या भागात केले असल्याने मराठवाड्यातील ऊस लागवड निदान काही वर्षेतरी बंद झाली पाहिजे, अशी मागणी वाढू लागली आहे.  विधानसभेत पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यावर आता राजकारण सुरू झाले आहे.
मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील सर्व गावे राज्य सरकारने दुष्काळग्रस्त गावे म्हणून घोषित केली आहेत. सध्या २१५१ गावांत २८५६ टँकर्सने पाणी पुरवले जाते आहे. ३५६ चारा छावण्या उभारण्यात आल्या असून त्यात ३ लाख ७२ हजार जनावरे ठेवण्यात आली आहेत. या भागातल्या लहान-मोठ्या अशा सर्वच धरण आणि बांधांमध्ये ७ एप्रिलपर्यंत केवळ ३ टक्के पाणी शिल्लक होते. बहुतांश प्रकल्प जानेवारीतच कोरडे ठणठणीत झाले आहेत. तापमान ४२ अंशाच्या पुढे चालल्याने बाष्पिभवन झपाट्याने होते आहे. त्यामुळे पाऊस लवकर आला नाही तर काय, असा भीषण प्रश्न संपूर्ण मराठवाड्यासमोर आहे. अशा परिस्थितीत क्रिकेटसाठी मैदानावर पाणी टाकावे लागू नये म्हणून ३० एप्रिलनंतर महाराष्ट्रात आयपीएल सामने घ्यायला न्यायालयानेच बंदी घातली आहे. आता मराठवाड्यात बनणाऱ्या बिअर आणि विदेशी मद्याच्या कारखान्यांचे पाणी बंद करण्याची मागणी वाढली आहे. कारण इथे २७ कोटी लिटर बिअर बनते आणि  एका लिटर बिअरसाठी चार लिटर पाणी वाया जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत तर हे प्रमाण एक लिटर बिअरसाठी १० लीटर पाणी असे होते, असेही सांगतात. मराठवाड्यात असे १६ कारखाने आणि डिस्टिलरीज् आहेत. राज्यातून दिल्या जाणाऱ्या सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्कापैकी चार हजार कोटी रुपये केवळ आणि केवळ मराठवाड्यातून दिले जातात त्याचे श्रेय याच दारू उत्पादनाला जाते. त्यामुळे या उत्पादनावर गंडांतर आणले जाणार नाही, अशी आशा त्या उत्पादकांना वाटते आहे. दुसरीकडे उद्योगांसाठी राखीव असलेल्या पाण्याच्या केवळ अर्धा टक्का पाणी बिअर आणि लीकर उत्पादनाला लागते आहे, असा दावा उद्योजकांच्या संघटना करीत आहेत.
मराठवाड्यातील दुष्काळाकडे बाॅलिवूडचेही लक्ष आहे. प्रख्यात अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशन स्थापन केले असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना त्या माध्यमातून मदत दिली जाते आहे. आता आमीर खानही पुढे आला असून त्याच्यासत्यमेव जयतेउपक्रमातून दुष्काळमुक्तीसाठी त्याने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील तीन तालुक्यात त्यांनी काम सुरू केले आहे. सत्यजीत भटकळ यांच्या पाणी फाऊंडेशननेही मराठवाड्यासाठी काम सुरू केले आहे. शिवसेना या पक्षाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पक्षातर्फे आर्थिक मदत तर दिलीच, पण शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न कमी खर्चात व्हावे यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचेही आयोजन मराठवाड्यात केले आहे. राज्य सरकारने नदी आणि नाले खोल आणि रूंद करण्याचे जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. यंदा चांगला पाऊस झाला तर त्या अभियानाचा काही प्रमाणात उपयोग होईलही. पण यंदाही पाऊस कमी झाला तर काय, या नुसत्या विचारानेही मराठवाड्यातील जनतेच्या पोटात गोळा उठतो आहे.

Thursday, February 25, 2016

संस्कारी उद्योगपतीचे जाणे…

एका बाजूला धर्म आणि परंपरांशी पक्की सांगड आणि दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानातून प्रगतीची ओढ असलेले भंवरलाल जैन हे एक आगळे वेगळे रसायन होते. व्यावसायिक दृष्टीकोन आणि कौशल्य यांची खाण असलेल्या या उद्योजकाच्या मुळांशी मात्र गांधी विचारांची मशागत होती. त्यामुळे व्यवसायातून उद्योजक आणि उद्योजकाचे उद्योगपती झाले तरी त्यांचे व्यवहार कधी भ्रष्ट झाल्याचे समोर आले नाही. दूरदृष्टी ही आणखी एक देणगी त्यांना निसर्गत:च मिळाली होती. त्या दृष्टीने त्यांनी उजाड माळरानावर नवी सृष्टी घडवली. त्याच दूर दृष्टीने त्यांनी आपल्या कंपनीचा विस्तार देशोदेशी तर केलाच पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे भारतातल्या शेतीला पाणी बचतीची अत्यंत मोलाची देणगी त्यांनी दिली. आता पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला संजीवनी देण्यासाठी काही ठोस काम करण्याची त्यांची इच्छा होती आणि त्या दृष्टीने त्यांचे कामही सुरू होते. आपल्या आजुबाजूचा, राज्यातला , देशातला कोरडवाहू शेतकरी आत्महत्या करताना ते ऐकत तेव्हा व्यथित होत. त्यांच्यासाठी काही तरी शाश्वत उपाय देऊन जायचा निर्धार त्यांनी केला होता; पण त्यात काही ठोस घडण्यापूर्वीच ते मृत्यूशी असलेली लढाई हरले आहेत.
खरं तर हार मानणे  या माणसाच्या स्वभावात नव्हते. त्यामुळेच अनेक वेळा हृदयाने दगा देऊनही त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला होता. प्रचंड इच्छाशक्ती हेही त्याचे कारण असावे. एखादी गोष्ट करायची ठरवली आणि ती या माणसाकडून झाली नाही, असे उदाहरणच नसेल.  संकटांनी आणि टीकेनेही ते कधी खचले नाही की निराश झाले नाहीत. टीका करणाऱ्यांनी त्यांचे काम करावे, मी माझे काम करीत राहीन, असे ते म्हणत. वेळ आलीच तर आपली भूमिका समजावून सांगण्याचा संयत प्रयत्न त्यांनी काही वेळा नक्की केला; पण त्यात कुठे राग नव्हता की द्वेष. असलीच तर समजावून सांगण्याची वडिलकीची भूमिका असायची. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला तरी त्याचीही प्रसिद्धी करायची गरज नाही असे ते त्यांच्याच मुलांना सांगत. या संयमाला मोठी मानसिक ताकद असावी लागते आणि ती भंवरलाल जैन यांच्यात ठासून भरलेली होती. याच मानसिक ताकदीने त्यांनी अनेक संकटांनाही धैर्याने परतावून लावले होते. ९० च्या दशकातला एक काळ असा आला होता की कोट्यवधीचे कर्ज त्यांच्यावर झाले होते. कंपनी बंद पडेल की काय, असे वाटू लागले होते. पण हा माणूस डगमगला नाही. नव्या उभारीने त्यांनी कंपनीला पुन्हा वर काढले आणि एका उच्च स्थानी नेऊन ठेवले. त्या संकटाच्या काळात ज्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्यांना साथ दिली त्यांचे ऋण त्यांनी कायम लक्षात ठेवले. कंपनीची परिस्थिती सुधारली तेव्हा त्यांना कंपनीचे भाग देऊन एक प्रकारे मालक बनवले. अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर आणि काहींच्या तर मृत्युनंतरही त्यांच्या कुटुंबाला कंपनीतर्फे सर्व सेवा आणि वेतन सुरू असल्याची अनेक उदाहरणे आहेत.  कृतज्ञता त्यांच्या रोमारोमातच होती. म्हणूनच ज्या आप्पासाहेब पवार यांनी त्यांना आधुनिक शेतीतंत्राची दिशा दाखवली त्या अप्पासाहेब पवार यांच्या नावाने त्यांनी कृषि पुरस्कार सुरू केले. ज्या जळगाव शहरात त्यांचा व्यावसायिक विकास झाला त्या जळगावला कर्मभूमीम्हणून कधी दूर सारायचे नाही, हा त्यांचा निर्धार होता. म्हणूनच देश विदेशात उद्योग उभारूनही त्यांनी जळगावशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही. वैद्यकीय  सुविधांची गरज असूनही ते मुंबईलाही राहीले नाहीत. ज्या जळगावने मला यश दिले त्या जळगावला मला विकासाचे स्त्रोत दिले पाहिजेत म्हणत त्यांनी उद्योगांचा विकास त्याच शहरात करत नेला. त्यामुळेच जळगावला एक वेगळी ओळख मिळाली हे कोणालाच नाकारता येणार नाही.
उद्योजक किंवा उद्योगपती ही त्यांची ओळख असली तरी त्यांची खरी ओळख  त्यांच्या संस्कारी असण्यात होती. जैन धर्माचे पालन करताना त्यांनी कुठे तडजोड केली नाही. तेच संस्कार त्यांनी पुढच्या पिढीवरही केले. उद्योग वाढताना कुटुंब तुटलेले अनेक घराणे समोर असताना या जैन कुटुंबाची एकसंघता मात्र आजही अभंग आहे. व्यावसायिक यशापेक्षा आणि त्याच्या समाधानापेक्षा अधिक समाधान त्यांना याच यशाचे असेल या विषयी यत्किंचितही शंका असण्याचे कारण नाही.
भंवरलाल जैन उपाख्य मोठे भाऊ यांना ज्यांनी जवळून अनुभवले ते कधीच त्यांना विसरू शकणार नाहीत. कार्य आणि कर्तृत्वाने तर त्यांना अमर केलेच आहे.

Wednesday, February 24, 2016

मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...




 खरंच, मला कळत नाहीये माझं असं काय झालंय....
म्हणजे, तसा मी बरा आहे वरवर..
पण आतून असं काय होतंय तेच समजत नाहीये.

मला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आठवतात
नंदुरबारचा शिरीषकुमारही डोळ्यापुढे दिसू लागतो
आणि भरून येते छाती देशप्रेमाच्या अदृश्य हवेने...
तीच हवा मग जेएनयूतल्या घोषणांचे दृश्य पाहून
दाब वाढवते माझ्याच धडधडणाऱ्या हृदयावरचा...
वाटतं.. कळ येतेय आता हृदयात....
हा दाब कमी करण्यासाठी बोललं पाहिजे काही तरी
किंवा लिहीलं तरी पाहिजे छाती मोकळी करणारं...

पण...
छे! शब्द कुठे दडून बसतात अचानक आणि
मी ना बालू शकत काही ना लिहू शकत...
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...

जेव्हा  आसेतू हिमाचल भारत वर्षासाठी
प्राण देणारे क्रांतीकारी डोळ्यासमोर येऊन उभे राहातात
आणि वाढवतात हृदयावरचा दाब,
तेव्हा काही वेळातच ज्ञानेश्वरही समोर येऊन ठाकतात..
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...

 काश्मीरच्या स्वातंत्र्यांच्या घोषणा देणाऱ्यांवर
टीकेची झोड उठवतात काही टीव्हीच्या पडद्यावर
तेव्हाही तीच हवा दाब वाढवायला लागते...
छाती फुटेल की काय असं वाटत असतानाच
पुन्हा ज्ञानेश्वरांची मूर्ती समोर दिसू लागते
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय..

याच साठी चढलो का आम्ही फासावर?
विचारू लागतात तेच क्रांतीकारी आणि
दिसू लागतात छातीवर गोळ्या झेलणारे सीमेवरचे तरूण सैनिक
तेव्हाही असंच होतं..
तेच ज्ञानेश्वर पुन्हा येऊन उभे राहातात समोर
आणि गाऊ लागतात आपलाच अभंग
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय..

इतिहासाच्या पुस्तकातून निघून हृदयात स्थिरावलेले क्रांतीकारी
आणि मराठीच्या पुस्तकातून डोक्यात शिरलेले ज्ञानेश्वर
दोघेही एकमेकांवर कुरघोडी करू पाहाताहेत आता
आणि माझे हृदय आणि मेंदू होताहेत रक्तबंबाळ त्यांच्या भांडणात
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...

याच साठी का दिले आम्ही प्राण? हा क्रांतीकारकांचा प्रश्न
आणि त्याला उत्तर ज्ञानेश्वरांचं...
अवघाची संसार सुखाचा करीन...असं सांगणारं..
कोण जिंकतयं, कोण हारतय...नुसतेच प्रश्न
खरंच मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...