खरंच, मला कळत नाहीये माझं असं काय झालंय....
म्हणजे, तसा मी बरा आहे वरवर..
पण आतून असं काय होतंय तेच समजत नाहीये.
मला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आठवतात
नंदुरबारचा शिरीषकुमारही डोळ्यापुढे दिसू लागतो
आणि भरून येते छाती देशप्रेमाच्या अदृश्य हवेने...
तीच हवा मग जेएनयूतल्या घोषणांचे दृश्य पाहून
दाब वाढवते माझ्याच धडधडणाऱ्या हृदयावरचा...
वाटतं.. कळ येतेय आता हृदयात....
हा दाब कमी करण्यासाठी बोललं पाहिजे काही तरी
किंवा लिहीलं तरी पाहिजे छाती मोकळी करणारं...
पण...
छे! शब्द कुठे दडून बसतात अचानक आणि
मी ना बालू शकत काही ना लिहू शकत...
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...
जेव्हा आसेतू हिमाचल भारत वर्षासाठी
प्राण देणारे क्रांतीकारी डोळ्यासमोर येऊन उभे राहातात
आणि वाढवतात हृदयावरचा दाब,
तेव्हा काही वेळातच ज्ञानेश्वरही समोर येऊन ठाकतात..
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...
काश्मीरच्या स्वातंत्र्यांच्या घोषणा देणाऱ्यांवर
टीकेची झोड उठवतात काही टीव्हीच्या पडद्यावर
तेव्हाही तीच हवा दाब वाढवायला लागते...
छाती फुटेल की काय असं वाटत असतानाच
पुन्हा ज्ञानेश्वरांची मूर्ती समोर दिसू लागते
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय..
याच साठी चढलो का आम्ही फासावर?
विचारू लागतात तेच क्रांतीकारी आणि
दिसू लागतात छातीवर गोळ्या झेलणारे सीमेवरचे तरूण सैनिक
तेव्हाही असंच होतं..
तेच ज्ञानेश्वर पुन्हा येऊन उभे राहातात समोर
आणि गाऊ लागतात आपलाच अभंग
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय..
इतिहासाच्या पुस्तकातून निघून हृदयात स्थिरावलेले क्रांतीकारी
आणि मराठीच्या पुस्तकातून डोक्यात शिरलेले ज्ञानेश्वर
दोघेही एकमेकांवर कुरघोडी करू पाहाताहेत आता
आणि माझे हृदय आणि मेंदू होताहेत रक्तबंबाळ त्यांच्या भांडणात
मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...
याच साठी का दिले आम्ही प्राण? हा क्रांतीकारकांचा प्रश्न
आणि त्याला उत्तर ज्ञानेश्वरांचं...
अवघाची संसार सुखाचा करीन...असं सांगणारं..
कोण जिंकतयं, कोण हारतय...नुसतेच प्रश्न
खरंच मला कळत नाहीये माझं असं काय झालंय...
Congratulations ...good to see your blog...
ReplyDelete