Wednesday, October 21, 2015

आता जबाबदारी पालकमंत्री कदमांचीच

औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त  प्रकाश महाजन यांच्या विरुद्ध महापालिकेत अविश्वास ठराव करवून घेण्यात पालकमंत्री रामदास कदम यशस्वी झाल्यानंतर २१ आॅक्टोबरच्या दिव्य मराठीच्या अंकात लिहिलेले भाष्य..
महापािलकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांच्या विरूद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर होणे हा पालकमंत्री रामदास कदम यांचा राजकीय विजय आहे. ज्या एमआयएमची भीती दाखवून शिवसेनेने महापािलका जिंकली त्याच एमआयएमला ऐनवेळी बरोबर घेण्यात कदम यांना यश आले. भारतीय जनता पक्षालाही त्यामुळे ठरावाच्या बाजूने राहावे लागले. शिवाय, खासदार चंद्रकांत खैरे यांचेही आपल्या निश्चयापुढे काही चालत नाही, हे ते प्रस्थापित करू शकले. परिणामी त्यांचे राजकीय वजन वाढले आहे. अर्थात, औरंगाबाद महापािलकेसाठी कार्यक्षम आणि धाडसी अधि
कारी तातडीने मिळवण्याची जबाबदारीही  या यशामुळे त्यांच्यावर आली आहे. जिथे काम करायला बहुतांश अधिकारी इच्छूक नसतात, अशा िठकाणांमध्ये औरंगाबाद महापालिकाही आता गणली जाते. या अविश्वास ठरावामुळे नोकरशाही आणखीनच सावध झाली असेल. त्यामुळे राज्यातील कार्यक्षम अधिकाऱ्यांपैकी एखाद्याला महापािलकेसाठी आयुक्त म्हणून आणणे हे यापुढचे कौशल्य असेल. नव्हे, अाता पालकमंत्री कदम यांची ती जबबादारी आहे. एकीकडे या शहराला स्मार्ट हाेण्याची स्वप्ने पडू लागली आहेत आणि दुसरीकडे प्राथमिक गरजांच्या पूर्ततेचा खड्डा मोठा होत चालला आहे. महापािलकेचा अर्थसंकल्प अजून रितसर मंजूर होऊ शकलेला नाही. उत्पन्नाची साधनेही घटली आहेत. अशा परिस्थितीत चांगले अधिकारी यायला धजावणार नाहीत. म्हणूनच पालकमंत्री आणि त्यांना साथ देणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनाही प्रामाणिक आणि कार्यक्षम आयुक्त लवकरात लवकर महापािलकेसाठी आणण्याचे आव्हान पेलावे लागेल. अन्यथा, हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागल्याचा दोष त्यांना पत्करावाच लागेल.

No comments:

Post a Comment