Thursday, January 26, 2023

ऑन द फिल्ड : प्रगती बाणखेले

जानेवारी २०२३. या ब्लाॅगवर लिहून ११ महिन्यांचा काळ लोटलाय. पण आता असे होऊ द्यायचे नाही असे मी ठरवले आहे. नव्या वर्षात दर महिन्याला एका मराठी पुस्तकाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करायचा निर्णय त्यासाठी घेतला आहे. त्यामुळे शिस्तीत वाचन आणि लेखनही होईल, असा हेतू आहे. अर्थात, हा निर्धार सिद्धीस जाण्यासाठी तुम्हा सगळयांच्या शुभेच्छा मात्र हव्या आहेत. जानेवारीसाठी मी आमचीच व्यवसायभगिनी अर्थात, पत्रकार प्रगती बाणखेले यांचे ‘ऑन द फिल्ड’ हे पुस्तक निवडले आहे. त्याचा माझ्या दृष्टिकोनातून करून दिलेला हा परिचय तुम्हाला कितपत भावतो हे मला प्रतिक्रिया नोंदवून कळवा, ही अपेक्षा आहे. पुढच्या महिन्यात राजू बावीसकर यांच्या काळ्या निळ्या रेषा या पुस्तकाचा परिचय करून देण्याचा प्रयत्न असेल. 












पुस्तकाचा रसास्वाद 


लोकांना मोठमोठे लेख वाचायला आता वेळ नाही आणि त्यामुळे लहान आकारात लिहिलं पाहिजे,
हा विचार जसजसा बळावत चालला आहे तसतशी रिपोर्ताज् प्रकार लिहिणाऱ्यांची किंवा ज्याला
इंग्रजीत ‘लाँग फाॅर्म जर्नालिझम’ म्हणतात ती करणाऱ्यांची संख्याही रोडावत चालली आहे. त्याचे
परिणाम काय होताहेत, याचा अजून फारसा कोणी म्हणजे पत्रकारीतेच्या क्षेत्रातील मंडळींनीच
पुरेशा गांभीर्याने विचार केलेला नाही. एखादा विषय, प्रश्न किंवा परिस्थिती जास्तितजास्त मितींतून
समजून घेण्याची भूक असणाऱ्यांची त्यामुळे काहीशी उपासमार सुरू आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत
मराठीतील अनेक साप्ताहिके काही प्रमाणात ही भूक भागवण्याचा प्रयत्न करीत होते; पण
अलिकडे त्यांची संख्याही इतकी रोडावली आहे की, मराठीत काही साप्ताहिके निघतात की नाही,
असा प्रश्न पडावा. जर वाचकांना लाँग फाॅर्म जर्नालिझमची भूक असेल तर ही साप्ताहिके, मासिके
का बंद पडताहेत, असा प्रश्न संक्षिप्त मजकुराचे समर्थन करणाऱ्यांकडून येऊ शकतो. त्यांचे
म्हणणे अगदीच चुकीचे आहे असेही नाही. किती लिहीले यापेक्षा काय आणि कसे लिहिले याला
अधिक महत्व असायला हवे, हा युक्तिवाद कसा नाकारता येईल? असो. त्यातल्या त्यात मराठीत
दिवाळी अंकांनी हा वृत्तांकनाचा प्रकार काही प्रमाणात का असेना सांभाळला आहे. अनेक दिवाळी
अंक तर उत्तम रिपोर्ताजसाठीच ओळखली आणि वाचली जातात. त्यामुळे काही विषय तरी
वेगवेगळ्या मितींतून, विविध अंगांनी समजून घेण्याची संधी त्याची गोडी असणाऱ्या वाचकांना
मिळते. 
अशीच वेगवेगळ्या दिवाळी अंकांतून वेगवेगळ्या विषयांवर रिपोर्ताज लिहीणारी पत्रकार प्रगती
बाणखेले यांनी त्यांच्या रिपोर्ताजचे पुस्तक ‘ऑन द फिल्ड’ या नावाने नुकतेच प्रकाशित केले आहे.
पुस्तक फार मोठे नाही. अवघी १८४ पाने आहेत. त्यामुळे लवकर वाचून संपते. पण ते संपते तेव्हा
वेगळ्या जगाची ओळख वाचकाला झालेली असते. कारण जिथे सर्वसामान्य माणूस कधीच जाऊ
शकत नाही तिथे लेखिका पोहोचली आहे आणि त्यासाठी पत्रकारीतेचा तिला चांगला उपयोग झाला
आहे. मानवी हक्कांच्या अनुशंगाने लेखन आणि वार्तांकन करणारी ही पत्रकार उत्तम लेखिकाही
आहे. त्यामुळेच पुस्तकातल्या  ११ पैकी एकही लेख कंटाळवाणा वाटत नाही. 
मुंबईत पत्रकारीता करण्याचे काही फायदे आहेत जे लेखिकेसारख्या पत्रकारांना आवाका असेल
तितके आणि तसे काम करण्याची संधी सहज मिळवून देतात. मानवी अधिकारांबाबत सातत्याने
लिखाण करणाऱ्या पत्रकारांना मानवी अधिकारांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या
स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या देशांत परिषदांना आणि ग्राऊंड रिपोर्ट करायला आमंत्रित करीत
असतात. मुंबईत राहून काम करणाऱ्या पत्रकारांना परिषदांना जाऊन अभ्यास करण्याची संधी
मिळत राहाते. अशाच परिषदांच्या निमित्ताने लेखिकेला पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांमध्ये
जाण्याची संधी मिळाली आहे. त्यातून तयार झालेले दोन्ही लेख अत्यंत वेगळे आहेत. 
श्रीलंकेत अनेक वर्षे सुरू असतलेली यादवी समूळ संपवताना तिथल्या तमीळ लोकांशी सरकार,
सैन्य कसे वागले याची अत्यंत करूण आणि हादरवणारी कहाणी लेखिका सांगते. अर्थात, तिथल्या
लोकांशी दुभाषांच्या माध्यमातून संवाद साधत पीडितांच्या तोंडूनच या कथा सांगितल्या गेल्या आहेत.
श्रीलंकेतील एलटीटीई अर्थात, लिबरेशन टायगर्स ऑफ तमील ईलम या संघटनेला भारतातून कसे
छुपे सहाय्य मिळत होते आणि त्यामागे  तामिळनाडूतील मतांसाठी केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांचे
डोके कशा प्रकारे चालत होते याचे अनेक संदर्भ वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये पूर्वीच येऊन गेले आहेत.
त्याचा किंचतसाही उल्लेख या लेखात येत नाही. पण श्रीलंकेतील तमीळ नागरिकांवर
सैन्याधिकाऱ्यांकडून होणारे अत्याचार, त्यांच्यातील तरुणांचे ते केवळ तामिळी आहेत म्हणून होणारे
हत्यांकांड, कायद्याची अस्तित्वहीनता याचे अत्यंत परखड वर्णन लेखिका बिनदिक्कतपणे करते.
बौद्ध हा श्रीलंकेतील बहुसंख्यांकांचा धर्म. बहुसंख्यांक असूनही असुरक्षिततेची भावना लोकांमध्ये
निर्माण करून द्यायची आणि त्याचा राजकीय लाभ उठवायचा, हा बहुतांश देशातील सत्तापिपासूंचा
हेतूपूर्तीचा सोपामार्ग. श्रीलंकेतही याच असुरक्षिततेच्या भावनेतून बहुसंख्यांक बौद्धांकडून मुस्लीम
धर्मियांवर दहशत बसविण्यासाठी होणारे प्रकार प्रगति यांनी मांडले आहेत. 
पाकिस्तानशी संबंधित दोन रिपोर्टाज् या पुस्तकात आहेत. मुंबईचा एक उच्चशिक्षित तरूण समाज
माध्यमांतून ओळख झालेल्या पाकिस्तानातील तरुणीच्या प्रेमात पडतो आणि तिच्यासाठी म्हणून
मोठा धोका पत्करून अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानात कसा पोहोचतो, तिथल्या तुरुंगात डांबला
गेल्यानंतर त्याच्या अस्तित्वाविषयीच बाळगले गेलेले गुढ आणि शेवटी महत् प्रयासाने झालेली त्याची
सुटका हे एखादा चित्रपट पाहातो आहोत असे वाटायला लावणारे घटनाक्रम लेखिकेने अत्यंत
कौशल्याने आणि संयमाने हाताळले आहेत. यात सर्वाधिक आकर्षित करते ते त्या देशातल्या
मानवी हक्कासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचे धारिष्ट्य आणि सीमांच्या किती तरी पल्याड जाणारी
त्यांच्यातील मानवतावादी सहृदयता. एक तरूण मुलगी पत्रकार म्हणून काम करता करता
पाकिस्तानात त्या तरूणाचा शोध घेऊ लागते, त्या प्रयत्नांना दाद न देणाऱ्यांच्या विरोधात आवाज
उठवते आणि त्याचे जीवावर बेतावे असे परिणामही भोगते. तिच्या सारख्या आणखीही काही व्यक्ती
या रिपोर्टाज् मध्ये येतात आणि देशांच्या सीमा या केवळ राजकारण्यांना राजकारण करता यावे
म्हणून आखल्या गेल्या आहेत याची जाणीव हे प्रकरण वाचणाऱ्यांना होत राहाते. पाकिस्तानशी
संबंधित दुसरा एक लेख लाहोर या शहराविषयी आहे. लाहोरी आदरातिथ्य काय असते, तिथले
खाद्य पदार्थ, रस्ते, इमारती यांची छानशी सफर लेखिका तिच्या शैलीत वाचकाला करवून आणते.
एक लेख खरे तर गुजरातमधील मच्छीमारांच्या जगण्यावर आहे. पण त्यातही पाकिस्तानी
तटरक्षकांनी अटक केल्यानंतरचे भारतीय मच्छीमारांचे हाल, त्यांच्या कुटुंबियांची होणारी फसवणूक,
त्यातून होणारी वाताहत, भारताचे कैदी हस्तांतरणाबाबतचे धोरण यावर अधिक भाष्य आहे. 
या पुस्तकातील दोन लेख ट्रान्सजेंडर लोकांच्या जगण्याची ओळख करून देणारे आहेत. त्यातील
एक गौरी या तृतियपंथीच्या आयुष्याचा आलेख मांडणारा आहे आणि दुसरा एकूणच या वर्गातील
लोकांच्या जगण्यावर, त्यांच्या वागण्यात, राहाण्यात होत असलेल्या बदलावर बेतलेला आहे. एकीकडे
बाईची लक्षणे दिसतात म्हणून कुटुंबियांनी तोडलेले आणि दुसरीकडे समाज जोडून घ्यायला तयार
नाही. अशा अवस्थेत या व्यक्ती एकमेकांचाच आधार कसा बनतात, त्यांच्या भावनीक, शारीरिक
ओढाताणीतून होणारी त्यांची कुतरओढ कशी हृदयद्रावक असते याचे यथार्थ वर्णन लेखिका करते.
हा लेख केवळ माहितीवर आधारलेला नाही. त्यांच्यापैकी अनेकींशी मैत्री करून, त्यांच्या सहवासात
वेळ घालवून, त्यांच्याकडून सुरू झालेली स्वाेद्धाराची कामे प्रत्यक्ष पाहून हे दोन्ही लेख लिहिलेले
असल्यामुळे ते या त्रिशंकू जगण्यातील दाहकता वाचकाला हेलावून टाकते. 
उर्वरित लेख हे सर्वसामान्यांसाठी फारशा अज्ञात नसलेल्या विषयांवर आहेत. हरियाणात
वेगवेगळ्या एनजीओंमार्फत वंचित मुला-मुलींच्या शिक्षणासाठी उद्धारासाठी सुरू असलेल्या
कामाची ओळख करून देणारा एक लेख व्हाईट काॅलर वर्गासाठी दृष्टीपल्याडच्या जगाची ओळख
करून देणारा आहे. स्वयंसेवी संस्था हळूहळू का असेना, पण ‘नाही रे’ वर्गाचे जगणे आणि जाणीवा
बदलण्यात यशस्वी होत असल्याचा सुखावणारा अनुभव या लेखातून येतो. एक लेख बालाघाटातील
म्हणजे बीड जिल्हा आणि परिसरातील बालविवाहाची स्थिती किती विदारक आहे आणि बालपणीच
किती मुलींचे जगणे नरक बनते आहे हे सांगत जातो. त्याच भागातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील
काही जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणावर येणारी गदा दाखवून देणाऱ्या दुसऱ्या
एका लेखात पत्रकार असलेली ही लेखिका व्यवस्थेच्या गलथान कारभाराच्या चिंध्या वेशीवर टांगते.
त्यातही काही सुखावणारी उदाहरणे आणि व्यक्ती, संस्थांचा परिचय करून देत आंधार भेदायलाही
काही पणत्या जळत असल्याची जाणीव करून देते. मुंबईतील भटक्या जमातींच्या जगण्यावर प्रकाश
टाकणारा एक लेख फारसा खोलात जाऊन लिहिला आहे असे वाटत नाही. अर्थात, त्या विषयाचा
व्याप आणि आवाका असा एखाद्या लेखात मावणारा नाहीच. त्यामुळे लेखिकेने जे काही केले आहे
ते खूप तोकडे आहे याची जाणीव असल्याची नोंदही केली आहेच. शेवटच्या लेख पत्रकारांसाठी
नेहमीचा आणि आवडीच्या विषयावरचा आहे. अर्थात, गावागावात निवडून येणाऱ्या सरपंच, पंच
आणि इतर पदाधिकारी महिलांचे काय चालले आहे याचा आढावा प्रत्यक्ष त्या महिलांशी बोलून,
त्यांच्या टीकाकारांशीही संवाद करून लिहिला आहे. एरवी ज्याकडे पाहिले जात नाही त्या महिलांच्या
सकारात्मक ऊर्जेवर आणि कामांवर प्रकाश टाकण्यात आल्यामुळे वेगळे काही वाचल्याची थोडी
अनुभूती मिळते. गेल्या काही वर्षात लिहीलेले हे लेख असल्यामुळे त्यांचे संदर्भमूल्य कमी होऊ नये
म्हणून त्या बाबतीत सध्या काय परिस्थिती आहे, याची जोडही या लेखांना शेवटी देण्यात आली आहे.
त्यामुळे शिळेपणाच्या दोषापासून आपोआपच मुक्ती मिळाली आहे. 
एकूणच, केवळ ‘फिक्शन’मध्ये रमायला ज्यांना आवडत नाही आणि वास्तववादी लेखनातील
जडपणाही पेलवत नाही त्यांच्यासाठी कथामूल्य असलेले हे सर्वच वास्तववादी लेख नक्कीच
वाचनानंद देणारे आहेत. तेवढेच नाही, अंतरमनातील मानवतेला साद घालण्याची ताकदही या
प्रसंगांमध्ये आणि प्रणिती यांच्या निवेदनशैलीत पुरेपूर आहे. मला हे पुस्तक आवडले आहे. 

माझ्या दृष्टीने ..
लेखनशैली : १० पैकी ०९
प्रासंगिकता : १० पैकी ०८
निर्मिती मूल्य : १० पैकी ९.५
एकूणात गुण :  १० पैकी ०९ 
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन, पुणे
पाने :  १८४
किंमत : २४० रुपये 
—--------------------------

No comments:

Post a Comment